नगर -देशात केंद्र सरकाने तातडीने कोट्यावधी रुपयांचे अनुदान पाठवून करोनाच्या या संकटात मदत कार्य सुरु केले. मात्र, राज्य सरकाने स्वतःच्या तिजोरीतून किती रुपयांचे अनुदान देऊ जनतेला मदत केली हे जाहीर करावे. आज राज्यात जे मदत कार्य चालू आहे ते फक्त आणि फक्त केंद्र सरकार कडून आलेल्या अनुदानातूनच चालू आहे.
पंतप्रधानांनी संकट काळात मदत दिल्याने जनतेला आधार मिळाला आहे. मात्र, राज्य सरकार जनतेसाठी काहीही करत नाहीये. राज्यातील हे तीन पक्षांचे सरकार म्हणजे तीन तीगाडा… काम बिगाडा…, कोणाचाच कोणाला ताळमेळ नसलेले हे अमर, अकबर,अँथनी आहेत, अशी उपहासात्मक टीका केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर केली.
मंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच नगरला धावती भेट दिली. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवास्थानी ते थांबले होते. यावेळी मंत्री दानवे यांनी गांधींच्या निवास्थानाहून पुण्याच्या भाजपच्या महिला आघाडीच्या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मार्गदर्शन केले. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर ते प्रथमच नगरला आल्याबद्दल त्यांचे दिलीप गांधी व सुवेंद्र गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, चेतन जग्गी, सागर गोरे, देवेंद्र गांधी, भरत ठुबे आदी मोजके कार्यकर्ते उपस्थित होते. नगरला आल्यावर दिलीप गांधी हे माझे कायमच उत्साहात व आदराने स्वागत करतात, असेही मंत्री दानवे यावेळी म्हणाले.