उंब्रज – गत पाच वर्षांत सेना भाजपा सत्तेवर असताना दलित अन्याय -अत्याचाराच्या असंख्य घटना घडलेल्या आहेत. काही आंदोलने करुनही न्याय मिळाले नाहीत.
बहुजन समाजावरील अन्याय रोखण्याची जातीयवादी शक्तीला सत्तेपासून रोखा आणि बहुजन समाजावरील अन्यायाविरोधी लढण्याची ताकद फक्त वंचित बहुजन आघाडीमध्येच आहे म्हणूनच वंचित बहुजन.आघाडीला सत्तेत पाठवा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केले.
उंब्रज, ता. कराड येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मतदार आभार मेळाव्यात ते बोलत होते. कराड उत्तरचे अध्यक्ष संतोष किरत यांच्या नेतृत्वाखाली मतदार आभार मेळावा आयोजित केला होता. यावेळी जिल्हा समन्वयक बाळकृष्ण देसाई, कराड उत्तर अध्यक्ष संतोष किरत, दादासाहेब कांबळे, युवक आघाडीचे अध्यक्ष संदिप बैले, अनिल आंबवडे, अनिल कांबळे, उंब्रज शहर अध्यक्ष सुरेश बैले, पिंटू बैले, जयराम बैले, मुकूंद निकाळजे, सिध्दार्थ वाकले, महेंद्र वाघमारे, महिला आघाडी अध्यक्षा संगीता लोकरे, संघटक रेखा वायदंडे, प्रतिक्षा न्यायनित यांची प्रमुख उपस्थिती होती.
खंडाईत म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये मताचा अधिकार कशासाठी मिळवून दिला आहे, हेच काहींना अजून कळलेले नाही. कार्यकर्त्यांनी मतदानाचे महत्व सर्वसामान्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा.
वंचित बहुजन आघाडीची स्थापना ही वंचितांना सत्ता मिळावी. यासाठी झाली असून काही वंचित आघाडी बद्दल चुकीची माहीती पसरवित आहेत त्याकडे लक्ष देऊ नका. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ताकद दाखवून दिली आहे. समाजातील बहुजन एकत्र आल्यास त्यांच्या हक्काचे सरकार स्थापन होऊ शकते. यासाठी लाचारी झुगारून द्यायची असेल तर सर्वांनी एकत्र यावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. संतोष किरत यांनी आभार मानले.