जीर्ण वसाहतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ः नवीन इमारत बांधण्याची मागणी
अकलूज (प्रतिनिधी) – माळशिरस येथील पोलीस वसाहत गेल्या 25 वर्षापासून जीर्ण व धोकादायक झाली आहे. त्यामुळे ही वसाहत कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने या वसाहतीत एकही पोलीस कर्मचारी राहण्यासाठी धजावत नाही.त्यामुळे येथील जुनी वसाहत पाडून त्या ठिकाणी नवीन वसाहत बांधण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे, अशी माहीती भारतीय दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब लोखंडे यांनी दिली.
माळशिरस येथे पोलिसांची राहण्याची गैरसोय होत आहे. तुटपुंज्या पगारात भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. रात्री अपरात्री घटना घडल्यावर त्या ठिकाणी वेळेत पोहोचता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाला नागरिकांच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. येथील वसाहतीसमोर मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे. या वसाहतीच्या छताची तसेच इमारत जीर्ण झाल्यामुळे ही इमारत कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधल्यास पोलीस बांधवांचीही गैरसोय थांबेल. बाहेरुन येणारे पथक, पोलीस तसेच होमगार्ड यांची चांगली सोय होईल.
माळशिरस येथे असलेली पोलीस वसाहत जीर्ण झाल्यामुळे पूर्णतः डगमगली आहे. या वसाहतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी या ठिकाणी नवीन वसाहत बांधण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे.
– विजय लोखंडे, अकलूज शहराध्यक्ष, भारतीय दलित महासंघ.