मंत्री जयंत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
शिराळा – शिराळा, वाळवा तालुक्यात हरितक्रांती घडवणाऱ्या वाकुर्डे योजनेचे पाणी जून महिन्याअखेर रेठरे धरण तलावात येणार आहे. तसेच आता वाकुर्डे योजनेची चिंता करू नका ती आम्ही पूर्ण करणारच, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले
यावेळी आ. मानसिंगराव नाईक, देवराज पाटील, ऍड. भगतसिंग नाईक आदींची उपस्थिती होती. मंत्री पाटील म्हणाले, वाकुर्डे योजनेला गती देण्यासाठी आज आम्ही या योजनेची खिरवडे, करमजाई, मानकरवाडी, करमाळे, टाकवे, शिराळा एमआयडीसी याठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. या योजनेचे पाणी शिरशी बोगद्यातून पाचुंब्री येथे नेण्याचा नविन प्रस्ताव असून त्यास आम्ही गती देणार आहोत. या योजनेमध्ये शिराळा तालुक्यातील कारमाळे या गावात पाणी जात नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आग्रहाची मागणी केली तीही आम्ही पूर्ण करणार आहोत.
तसेच रेड कालव्यातून लिफ्टने पुढे नेणार आहे. मानकरवादी येथील भूसंपादित केलेल्या जमिनी गरज नसतील त्या शेतकऱ्यांना परत करू. आघाडी सरकारने या योजनेचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करून कारमजाई तलावात आणले. त्याचा फायदा मोरणा धरण व नदी काठच्या गावांना होत आहे. तसेच येणपे बोगद्यातून पाणी कराड तालुक्यालाही मिळाले आहे.
यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते, अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, विजयराव नलवडे, दिनकर पाटील, विश्वास कदम, दिनकर महिंद, विजय पाटील उपस्थित होते.