सिग्नल असून अडचण नसून खोळंबा; पोलीस व पालिका प्रशासनाची भूमिका संदिग्ध
कराड – कराड आणि वाहतूक कोंडी ही कराडवासीयांच्या अंगवळणी पडल्याचे चित्र झाले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असो वा अन्य मार्गावरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. पालिका आणि पोलीस प्रशासन याकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे गजबजलेल्या बसस्थानकाचा परिसर म्हणजे वडाप वाहनांचे आगार बनले आहे. परिणामी हा
परिसर सुलभ वाहतुकीसाठी डोकेदुखीचा ठरत आहे.
कराड शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनला आहे. त्यावर मार्ग काढण्याऐवजी पालिका आणि पोलीस एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. येथील दत्त चौक, मुख्य बाजारपेठ, चावडी चौक, कन्याशाळा चौक, जोतिबा मंदिर परिसर, महिला कॉलेज चौक, कृष्णानाका चौकासह येथील कोल्हापूरनाका परिसर म्हणजे वाहतूक कोंडीचे आगारच बनले आहे.
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालिका, पोलीस प्रशासन तसेच विविध वाहतूक संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी शहरातील वाहतूक आराखडा तयार केला आहे. मात्र, तो कोणत्या लॉकरमध्ये ठेवला आहे, हा खरा संशोधनाचा विषय आहे. पुणे वाहतुकीला शिस्त लावणाऱ्या व वाहतूक विभागाच्या अधीक्षक म्हणून ज्यांनी काम पाहिले, त्या तेजस्वी सातपुते या पोलीस अधिकारी सातारा जिल्ह्याला अधीक्षक म्हणून लाभल्या आहेत. त्यांनी सातारचा पदभार स्वीकारल्यानंतर कराड शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी भावना कराड वासीयांमध्ये होती. मात्र ती सपशेल फोल ठरली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पालिका व पोलीस प्रशासनात बैठक झाली. यावेळी वाहतूक आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी व वाहतूक अडथळा काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याचे निश्चित झाले आहे. मात्र त्याची अंमलबजाणी झालेली नाही. परिणामी कराड शहरातील वाहतुकीचा खेळखंडोबा झाला. कराडचा बसस्थानक परिसर म्हणजे वाहतुकीचे कोंडाळेच, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
हाप्तेखोरीची चर्चा…
सिग्नलच्या काही मीटर अंतरामध्ये वाहने उभी करण्यास वाहतूक कायद्याने बंदी आहे. मात्र, या कायदा उघड्या डोळ्यांनी मोडला जातो, तोही वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत. रस्त्याच्या दुर्तफा अकरण्याऐवजी पोलीस नागरिकांवरच तोंडसुख घेताना दिसत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलीस व वडाप वाहतूकदार यांच्यात हाप्तेखोरीची चर्चा आहे.