सातारा -जिल्ह्यामध्ये भाजप नंबर एकचा पक्ष बनलेला आहे. यापूर्वीच्या जिल्हाध्यक्षांनी अत्यंत तळमळीने काम करून जिल्हाध्यक्षपदाची उंची वाढवलेली आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर प्रदेश कार्यकारिणीने जबाबदारी टाकली आहे त्यासाठी मी निश्चित पात्र ठरून पक्षाचा विश्वास सार्थ ठरवणार आहे. जिल्ह्याच्या राजकीय वाटचालीमध्ये सर्व सदस्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे, असे भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर झाल्यानंतर कदम यांचे प्रथमच आगमन झाल्यानंतर शिरवळ, खंडाळा, सातारा आदी ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत झाले. त्यानंतर येथील हॉटेल लेक व्ह्यूच्या दालनात धैर्यशील कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रदेश कार्यकारणी उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, प्रदेश कार्यकारणी सदस्य गीतांजली कदम, रंजना रावत, दत्ताजी थोरात उपस्थित होते. धैर्यशील कदम म्हणाले, “”माझ्या कुटुंबाला कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही. गेल्या 30 वर्षापासून मी राजकारणामध्ये सक्रिय आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भाजपच्या वरिष्ठांनी मोठा विश्वास टाकला आहे.
तो सार्थ करण्यासाठी अत्यंत तळमळीने काम करून भारतीय जनता पक्षाचे कार्यक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वसमावेशकतेने मी काम करेन.” जिल्ह्यातील निर्णय प्रक्रियेत जिल्ह्यातील भाजपच्या सर्व सदस्यांना सामावून घेत काम करणार असल्याचे धैर्यशील कदम यांनी सांगितले. आ. जयकुमार गोरे म्हणाले, “”गेल्या वर्षभराच्या वाटचालीमध्ये मला पक्षाने जिल्हाध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली आणि जिल्ह्यातील वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो. पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आम्ही कार्यकर्ता म्हणून पार पाडणार आहे.” जिथे जिथे माझी गरज पक्षाला पडेल, त्या त्यावेळी मी उपलब्ध असणार असल्याचे त्यांनी जाहीर केले जयकुमार गोरे आणि धैर्यशील कदम यांच्याकडून पक्षाचे काम अत्यंत सक्षमतेने होईल असा विश्वासखा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.