भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी मालिकेतील पहिला सामना तीन दिवसांतच जिंकला. लगेच चाहते, माध्यमे इतकेच नव्हे तर आजी माजी क्रिकेटपटूही संघाचे गोडवे गायला लागले. पण अशा लुटूपुटूच्या लढाया जिंकून काय हाती लागणार आहे. या सायकलद्वारे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याचा हुरूप वाढणार आहे का?
आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दोन्ही वर्षी भारतीय संघाने पराभव स्वीकारला. एकदा न्यूझीलंडकडून तर दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाकडून. मग अशाच संघांशी कसोटी सामने खेळले पाहिजेत ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे. महान खेळाडूंशी दोन हात केले तरच हवा तसा अनुभव निळतो. वेस्ट इंडीजसारख्या संघाबरोबर खेळून काय मोठा अनुभव हाती लागणार आहे. त्यांच्या संघाची ताकद पाहिली तर असे वाटते की भारतातील कोणताही क्लब दर्जाचा संघही जास्त सरस खेळ करेल. एकतर वेस्ट इंडीजचा संघ गतवैभव गमावून बसला आहे. त्यांच्या संघाकडे काही खेळाडू जागतिक दर्जाचे आहेत परंतु जी त्यांची एकेकाळी ओळख होती ती केव्हाच पुसली गेली आहे.
आता त्यांच्या संघात ना फलंदाजी बळकट आहे ना गोलंदाजांचा ताफा. या गोलंदाजीवर यशस्वी जयस्वाल व कर्णधार रोहित शर्माने केलेले शतक निश्चितच कौतुकास्पद आहे; पण त्याचे मोल किती हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. केमार रोश आणि कंपनी म्हणजे वॉल्श, अम्ब्रोस नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे. यशस्वीसाठी हे शतक खास ठरेल कारण तो पहिलाच कसोटी सामना खेळत होता, त्यामुळे त्याच्या कारकिर्दीला नवे वळण मिळेल परंतु या कामगिरीवरून तो इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेत धावा करेल असा विश्वास बाळगणे चूक ठरेल. कसोटी सामन्यातील खरी गोलंदाजी त्याने अद्याप खेळलेलीच नाही. त्यामुळे तो मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जेम्स अंडरसन, स्टुअर्ट ब्रॉड यांच्यासमोर कसा खेळतो यावर त्याचे कसोटी संघातील महत्त्व ठरणार आहे.
जयस्वालला पैलू पाडावे लागतील
कर्णधार रोहित शर्माने जयस्वालला अंतिम संघात स्थान दिले व त्यानेही दीडशतकी खेळी करत हा विश्वास सार्थ ठरवला. आता हा जयस्वाल जर हिरा असेल तर त्याच्यावर पैलू पाडण्याचे काम करावे लागणार आहे तरच तो जास्त चमकेल. राहुल द्रविड आणि कंपनी यांच्यावर ही जबाबदारी आहे. कारण कोणताही फलंदाज जेव्हा पदार्पणाच्या लढतीत शतक फटकावतो तेव्हाच त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते नाहीतर तो स्वतःला मोठा समजू लागतो. एकदा का हा अंहकार पोटात शिरला की त्याला सल्ले वगैरे ऐकण्याचा कंटाळा येतो. हे आपण शिखर धवन, पृथ्वी शॉ वरून पाहिले आहे. गुणवत्तेला शिस्तीचे कोंदण असणे अत्यंत गरजेचे असते. त्याला अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. मुंबईच्या गल्लीतील एका ठिकाणी पाणीपुरी विकणाऱ्या व्यक्तीच्या घरात जन्माला आलेला जयस्वाल आता भारतीय क्रिकेट संघाच्या कोअर गटाचा सदस्य बनला आहे. आता त्याच्याकडे पैशाचा ओघ सुरू होईल पण त्याचे पाय जमिनीवर घट्ट राहण्यासाठी जे काही करणे गरजेचे आहे ते सर्व द्रविड आणि कंपनीने केले पाहिजे. आपल्याला लंबी रेस का घोडा हवा आहे, एखाद्या सामन्यातच चमकणारा खडा नको.
तंत्रातील दोष दूर व्हावेत
पहिल्या कसोटीत त्याची खेळी पाहताना अद्याप तो टी-20 क्रिकेटच्या मानसिकतेतून बाहेर आला नसल्याचे दिसले. त्याने जवळपास साडेतीनशे चेंडू खेळले याबद्दल कौतुकच वाटते. इतका काळ खेळपट्टीवर व्यतीत केल्यावर त्याचे दीडशतक साकार झाले याचाच अर्थ त्याच्याकडे संयमीपणे पाय रोवून उभे राहण्याची क्षमता निश्चितच आहे. पण सातत्याने सामने खेळल्यावर त्याच्या तंत्रातील दोषही समोर येतील ज्यातील काही या खेळीत जाणवले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे फुटवर्क. चेंडू टोलवताना त्याचे पाय वीरेंद्र सेहवागसारखे एका जागी घट्ट असतात, त्याची मुव्हमेंट होत नाही. हे मोठ्या फलंदाजाचे लक्षण नव्हे. सेहवागसारखा एखादाच त्यात यशस्वी ठरतो म्हणजे सगळेच यशस्वी ठरतील असे नव्हे. त्याचे पाय चेंडूच्या टप्प्यापर्यंत येताना दिसत नाहीत हा टी-20 क्रिकेटचा परिणाम आहे हे सहज लक्षात येते. या खेळीत त्याने काही ऑफसाइडचे चेंडू लेग साइडला टोलवले.
ते पाहायला मजा आली मात्र, तो मनगटी खेळाडू नसल्याने या प्रयत्नात तो बाद होण्याची शक्यता सर्वाधिक आहे व हे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड किंवा दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज सहज ओळखू शकतात. त्याच्या फलंदाजीत कट, पूल, स्टीअर, ग्लान्स आहे परंतु ऑफ ड्राइव्ह किंवा ऑन ड्राइव्ह करताना त्याच्या पायाची हालचालच होत नसेल तर तो प्रत्येकवेळी लागलेल्या सापळ्यात अडकेल अशी भीती वाटते. कारण आजचे गोलंदाज कोणत्याही मोठ्या मालिकेपूर्वी समोरच्या संघाच्या फलंदाजांचा व गोलंदाजांचा रेकॉर्डिंग पाहून कसून अभ्यास करतात व त्यानुसार योजना आखतात. जयस्वालला नेटमध्ये यावर मेहनत घ्यावीच लागेल. हे शतक कौतुकास्पद आहेच परंतु यानंतर खरी कसोटी सुरू होणार आहे व त्याच्याकडून अपेक्षाही वाढणार आहेत. त्यावर खरे उतरायचे असेल तर तंत्रही बळकट करावेच लागेल.
रोहितमुळे आशा वाढली
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने या कसोटीत शतक फटकावले मात्र, त्यानंतर तो ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहता त्याच्या फलंदाजीतील एक प्रश्न आताही कायम राहिला आहे. त्याची पूल मारण्याची हुकुमत आजही शाबूत आहे पण त्याचे तंत्र आताही कमीच पडत आहे. स्क्वेअर लेगला खेळताना तो काहीसा ऑफला जास्त शफल होताना दिसतो. अती वेगवान गोलंदाजासमोर त्याला असे शफल होण्यासाठी वेळ जास्त मिळणार नाही व तो त्रिफळा बाद किंवा पायचित निश्चितच होऊ शकतो. हाच दोष त्याच्या फलंदाजीतील गेल्या कित्येक वर्षांत दूर होऊ शकलेला नाही. कव्हर ड्राइव्ह मारतानाही त्याचे डोके व पाय तंत्रानुसार नसतात त्यामुळे चेंडू खाली राहण्याऐवजी वर जातो व झेलबादचा धोका निर्माण होऊ शकतो. अशाच पद्धतीने तो गेल्या दोन मोसमात बाद होत आहे. त्यालाही आता या मालिकेतील दुसऱ्या कसोटीद्वारे किंवा नेटमधील सरावात यावर भर देणे गरजेचे आहे. बाकी त्याच्या गुणवत्तेचा प्रश्नच नाही.
बीसीसीआयच्या मनात काय आहे?
भारतीय संघ आयपीएल स्पर्धा संपल्यावर लगेचच इंग्लंडला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायला गेला. त्यानंतर लगेचच वेस्ट इंडीजचा दौरा. यातून काय हाती लागणार आहे. खरेतर मोठ्या संघाविरुद्ध मालिका सातत्याने आयोजित केल्या तरच संघातील वरिष्ठ तसेच नवोदित खेळाडूंना महत्त्वाचा अनुभव मिळेल. वेस्ट इंडीजसारख्या देशाबरोबर खेळवून या लुटूपुटूच्या लढाया कशासाठी केल्या जात आहेत हा देखिल एक प्रश्न आहे. ज्या क्रिकेटला कसोटी म्हणतात ती वेस्ट इंडीजशी खेळून लागेल का, हा सरळसोट प्रश्न आहे. एकेकाळी त्यांचा संघ जगज्जेता होता पण एकेकाळी. तो काळ गेला आता त्यांना त्यांचीच ओळख निर्माण करायची आहे.
आपण अशा ठिकाणी आहोत की आपल्याला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका यांच्यावर वर्चस्व गाजवायचे आहे. तरच जागतिक वर्चस्व मिळवता व राखता येणार आहे. वासरांत लंगडी गाय शहाणी, असे म्हणतात इतपतच वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेचे महत्त्व आहे. येत्या काळात आपण मर्यादित षटकांचेच सामने खेळणार आहोत, त्यानंतर आशिया करंडक मग विश्वकरंडक व त्यानंतर मायदेशातच होत असलेल्या एकदिवसीय व टी-20 मालिका खेळायच्या आहेत मग त्यापूर्वी या दोन कसोटी सामन्यांचा घाट कशासाठी घातला गेला, त्यापेक्षा पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली असती तर जास्त चांगला अनुभव मिळाला असता. त्यामुळे मोठे युद्ध जिंकायचे असेल तर बीसीसीआयने पुढील काळात या अशा लुटूपुटूच्या लढाया खेळवू नयेत, हीच अपेक्षा.
कोहलीलाही सुधारणेला बराच वाव
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या डावात 76 धावांची खेळी करत कोहलीने जयस्वालपेक्षा दुय्यम भूमिका घेत संयमी फलंदाजी केली. ती खरेतर त्याच्या स्वभावातील नाही. परंतु काहीवेळा समोरचा फलंदाज भरात असेल तर असे करावे लागते. मात्र, जेव्हा जयस्वाल बाद झाला त्यानंतर कोहलीने गिअर बदलायला हवा होता. तो संथ फलंदाजीच्या कोशात गेला तो बाहेर आलाच नाही. जो कोहली राज्य करताना आपण पाहिला आहे तो कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो. पहिला चौकार फटकावण्यासाठी त्याने तब्बल 80 चेंडू घेतले. याला तंत्रशुद्ध फलंदाजी नव्हे तर विनाकारण केलेली रटाळ फलंदाजी म्हणावी लागेल. त्याचे अर्धशतक झाले पण त्यात ती कोहलीची नेहमीची ग्रेस नव्हती.
अमित डोंगरे