मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. त्यातच आता कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह आसपासच्या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वातावरणामुळे राज्यात पुढील चार दिवस प्रचंड उष्मा, ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस असा तिहेरी फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
देशाच्या वायव्येकडील राज्यांत उष्णतेची तीव्र लाट असून तेथून महाराष्ट्राकडे येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे. विदर्भात मंगळावारी काही भागांत उष्णतेची लाट कायम होती. तर, उर्वरित महाराष्ट्राचे तापमान सरासरीच्या पुढेच आहे. परिणामी राज्यात उन्हाचा चटका कायम आहे.
दरम्यान, सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याबरोबरच पश्चिम विदर्भ ते तामिळनाडू या भागापर्यंत मराठवाडा आणि कर्नाटक पार करून द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. तसेच देशात विविध ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत.
समुद्रातून काही प्रमाणात बाष्पही येत आहे. परिणामी दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. दुपारी उन्हाचा चटका आणि त्यानंतर ढगाळ वातावरणासह पावसाळी स्थिती असे विचित्र वातावरण राज्यात अनेक ठिकाणी आहे.