संभाजी पाटील निलंगेकर, आमदार
आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन आहे. भाजपाचे माजी मंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या शब्दांत भाजपाचा प्रवास जाणून घेऊया.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या उत्तरेकडील राज्यांबरोबरच कर्नाटक, आसाम, त्रिपुरा यासारख्या दक्षिण आणि ईशान्य भारतातील राज्यांतही सत्ता मिळवून भारतीय जनता पार्टीने आपले राष्ट्रव्यापी अस्तित्व खणखणीतपणे सिद्ध केले आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यातही भाजपाने सत्ता मिळवण्यापर्यंत आपले सामर्थ्य विस्तारले आहे. भाजपाच्या या वाटचालीमागे जनसंघ बांधणीसाठी ज्या नेत्या-कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले त्यांच्या परिश्रमाचा मोठा वाटा आहे. देशाची सत्ता सलग दोनदा आणि अनेक राज्यांत सत्तेवर असणारा भारतीय जनता पक्ष आज यशोशिखरावर असला तरी ही वाटचाल सोपी नव्हती. संघर्ष, परिश्रम, अपमान, उपेक्षा, विद्वेषी अपप्रचार अशा अनेक अडथळ्यांना तोंड देत जनसंघाचे नवे रूप म्हणजे भारतीय जनता पक्ष आज येथवर पोहोचला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या 42 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जनसंघाच्या उभारणीसाठी 1952 पासून स्वतःला समर्पित करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्मरण करणे उचित ठरेल. याच नेते-कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे जनसंघाला महाराष्ट्रात आपले अस्तित्व निर्माण करता आले. 1952 ते 1977 या काळात महाराष्ट्रात जनसंघ प्रबळ राजकीय शक्ती जरी बनला नव्हता, तरी जनसंघाने अन्य विरोधी पक्षांच्या तुलनेत वेगाने हातपाय पसरले होते, हे मान्य करावेच लागेल. या काळात जनसंघाची ओळख निर्माण करण्यासाठी उत्तमराव पाटील, लक्ष्मणराव मानकर, मोतीराम लहाने, रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ गोडबोले, सूर्यभान वहाडणे पाटील, मधुकरराव महाजन, वसंतराव भागवत, सुशीलाताई आठवले, क्षेमाताई थत्ते, हशू अडवाणी अशा असंख्य ज्ञात-अज्ञात नेत्या, कार्यकर्त्यांनी केलेली नांगरट भारतीय जनता पक्षाच्या प्रसारास पोषक ठरली. अनेक अडथळ्याशी लढण्यात जनसंघाच्या नेत्या-कार्यकर्त्यांना फार मोठी ताकद खर्च करावी लागली.
या अडथळ्यांना तोंड देत धिम्या पण निश्चित गतीने जनसंघाची वाढ सुरू राहिली. उत्तमराव पाटील हे जनसंघाचे पहिले प्रदेशाध्यक्ष आणि रामभाऊ गोडबोले हे जनसंघाचे पहिले संघटन मंत्री होते. जनसंघाने काश्मीरला वेगळा दर्जा देण्याविरोधात केलेल्या आंदोलनामुळे जनसंघाच्या संपर्कात आलेल्या उत्तमरावांनी 1953 पासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. व्यवसायाने वकील असलेल्या उत्तमरावांनी समाजाच्या विविध घटकांसाठी जनजागृती आणि आंदोलनाचा मार्ग पत्करला. 1954 मध्ये जनसंघातर्फे विधान परिषदेवर निवडून गेलेल्या उत्तमरावांनी 1957 मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली.
ग्रामीण महाराष्ट्र पिंजून काढत जनसंघाबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी उत्तमरावांनी मोठी मेहनत घेतली. आदिवासींना जमिनीचे पट्टे मिळण्यासाठीचा संघर्ष तसेच विधिमंडळात जाती-जमातींसाठी समित्या निर्माण करण्यासाठीचा आग्रह यातून उत्तमरावांनी जनसंघाचे कार्य विविध समाजघटकांपर्यंत पोहोचवले. 1980 मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर उत्तमरावांकडेच प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे आली. भाजपाच्या प्रारंभीच्या वाटचालीतही उत्तमरावांनी मोठे योगदान दिले.
जनसंघाचे पहिले संघटनमंत्री असलेले रामभाऊ गोडबोले यांना कार्यकर्ते, निवडणुकीसाठी उमेदवार शोधणे याबरोबरच पक्षासाठी निधी उभारणीचे आव्हानही पेलावे लागले. जनसंघाच्या संघटना प्रसारासाठी पूर्णवेळ कार्यकर्ते उभे करण्याची कल्पना गोडबोले यांनी प्रत्यक्षात आणली. प्रत्येक जिल्ह्यात असे पूर्णवेळ कार्यकर्ते उभे करत रामभाऊंनी संघटनेची बांधणी करणे सुरू केले. उत्तमराव पाटील यांना जनसंघाचे पहिले पूर्णवेळ कार्यकर्ते बनवत रामभाऊंनी विदर्भात लक्ष्मणराव मानकर, रायगडचे प्रभाकरपंत पटवर्धन, नगरचे सूर्यभान वहाडणे, सोलापूरचे अण्णासाहेब कवडी, मुंबईत मधुकरराव महाजन, पुण्यात वसंत परचुरे, नागपूरचे बच्छराज व्यास, कल्याणचे मुकुंद वझे असे डझनभर पूर्णवेळ कार्यकर्ते उभे करत गोडबोले यांनी जनसंघाच्या कामाला वेग दिला.
1957 च्या निवडणुकीत जनसंघाचे उत्तमराव पाटील आणि प्रेमजीभाई आसर हे दोन खासदार तर रामभाऊ म्हाळगी आणि अन्य चौघे आमदार म्हणून निवडून आले. गोडबोले यांनी 1969 पर्यंत जनसंघाची सूत्रे समर्थपणे सांभाळली. 1975 मध्ये ते राजकारणातून बाजूला झाले. लक्ष्मणराव मानकर यांनी विदर्भात जनसंघाच्या पायाभरणीसाठी अतोनात कष्ट उपसले. भंडारा जिल्ह्यातील पहिले पूर्णवेळ कार्यकर्ते असलेल्या मानकर यांनी उपेक्षित, वंचित समाज घटकांपर्यंत जनसंघाला पोहोचवण्यासाठी आंदोलने, लढे यांचा मार्ग पत्करला. 1957 मध्ये मानकर हे आमगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी विदर्भात जनसंघाच्या बांधणीसाठी मोठे योगदान दिले.
विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मोतीराम लहाने यांनीही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढे उभारत जनसंघाचा पाया विस्तारण्यासाठी मोठी मेहनत घेतली. मुंबईत मधुकरराव महाजन यांच्याकडे संघटना बांधणीची जबाबदारी देण्यात आली. मुंबईसारख्या विस्तारणाऱ्या बहुरंगी शहरात मधुकरराव महाजन यांनी विलक्षण मेहनतीने, चिकाटीने जनसंघाची संघटना बांधली. बाळासाहेब कानिटकर, हशू अडवाणी, वामनराव परब, प्रभाकरपंत पटवर्धन, राम नाईक अशी कार्यकर्त्यांची फळी मुंबईत तयार झाली.
जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पार्टीच्या संघटनेत पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या रचनेला मोठे महत्त्व आहे. भाजपाच्या स्थापनेनंतर वसंतराव भागवत यांनी प्रकाश जावडेकर, माधव भांडारी, विश्वास गांगुर्डे, किरीट सोमय्या, मधु सरस्वती पवार, धरमचंद चोरडिया अशी अनेक समर्पित कार्यकर्त्यांची फळी तयार केली. या “भागवत विद्यापीठा’तून प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे राष्ट्रीय पातळीवर चमकलेले नेतेही तयार झाले. महाजन, मुंडे जोडगोळीने धडाकेबाज कार्यपद्धतीचा अवलंब करत शेतकरी कर्जमाफी, संघर्ष यात्रा यासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून पक्षाचा पाया रुंदावत नेला.
1995 मध्ये युती सरकारच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला राज्यातील सत्तेत वाटा मिळाला. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मतदारांनी भारतीय जनता पार्टीला राज्याची सत्ताही दिली. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा पाया आणखी विस्तारत आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद जिंकत भारतीय जनता पार्टीची वेगवान घोडदौड चालू आहे. या यशामागे जनसंघापासूनच्या कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्यांचे कष्ट आहेत. दुर्दम्य राष्ट्रवाद आणि असीम पक्षनिष्ठा याच्या बळावर भाजपा यश शिखरावर विराजमान झाला आहे.