नवी दिल्ली – पायाभूत सुविधांच्या विकासातील ‘गुणवत्तेवर’ लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच नवीन कल्पना, संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानासाठी इनोव्हेशन बॅंक स्थापन करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
इंडियन रोड कॉंग्रेस च्या 222 व्या मिड-टर्म कौन्सिल मीटिंगच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना, ते बोलत होते.
ते म्हणाले की,इंडियन रोड कॉंग्रेस आणि आयआयटी यांनी जागतिक संस्थांच्या मदतीने जागतिक दर्जाची अत्याधुनिक प्रयोगशाळा विकसित केली पाहिजे. भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी पायाभूत सुविधांच्या विकासाची महत्त्वाची भूमिका आहे.
रस्त्यांचा आणि पायाभूत सुविधांचा त्या प्रदेशाच्या समृद्धीशी थेट संबंध आहे. गडकरी म्हणाले की, गेल्या 8 वर्षांत राष्ट्रीय महामार्गांची लांबी 2014 मधील 91,000 किमीवरून आता 1.47 लाख किमी झाली आहे. आमचे सरकार 2025 पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे जाळे 2 लाख किलोमीटरपर्यंत विस्तारित करण्यासाठी समर्पितपणे काम करत आहे.
गेल्या 8 वर्षांत आमच्या टीमने अनेक जागतिक विक्रम केले आहेत, असेही ते म्हणाले. सरकार ईशान्य भारताच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी तेथे आत्तापर्यंत 45,000 कोटी रुपये खर्चून 2344 किमी महामार्ग बांधण्यात आला आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.