नवी दिल्ली – केंद्र सरकारने व्यापक विचारविनीमय करूनच लष्कर भरतीसाठी अग्निपथ ही नवीन योजना आणली आहे. परंतु राजकीय कारणासाठी त्या योजनेला विरोध केला जात आहे असे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.
या योजनेतून सैनिक भरती प्रक्रियेत क्रांतिकारी बदल घडवून आणण्यात आला आहे असे सांगून ते म्हणाले की, योजनेंतर्गत भरती होणाऱ्या जवानांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ही नवीन योजना असल्याने लोकांमध्ये काही संभ्रम निर्माण होऊ शकतो असे राजनाथसिंह यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कॉन्क्लेव्ह मध्ये बोलताना सांगितले.
माजी सैनिक आणि आजीमाजी लष्करी अधिकाऱ्यांशी सुमारे दोन वर्षे विचारविनिमय केल्यानंतर ही योजना आणण्यात आली आहे सर्वसहमतीने त्यावर निर्णय घेण्यात आला आहे असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.
लोकांमध्ये देशासाठी शिस्त आणि अभिमानाची भावना निर्माण व्हावी, अशी आमची इच्छा होती. या योजनेला होणारा विरोध राजकीय स्वरूपाचा आहे असे ते म्हणाले. राजकारण करताना देशहिताला बाधा येणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे असे ते म्हणाले.