अलिबाग – अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा परावर्तीत होऊन निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ श्रीवर्धन जवळ समद्रात आले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, श्रीवर्धनहून मुरुडमार्गे अलिबागकडे दिशेने सरकत असुन दुपारी 12.30 च्या सुमारास अलिबाग किनारपट्टी परिसरात थडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळपासूनच वाहत असलेल्या वारा वेग धरत असून समुद्रातील लाटांची उंचीदेखील वाढत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. श्रीवर्धन किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत असून मुसळधार पाऊस देखील पडण्यास सुरुवात झाली आहे.
रायगड किनारपट्टीवरील 60 गावांमध्ये सुमारे 1 लाख 73 हजार नागरिक राहत आहेत. येथे कुठल्याही प्रकारे मनुष्यहानी होऊ नये, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. एडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या असून एक तुकडी हरिहरेश्वर तर दुसरी अलिबागला तैनात आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या 5 हजार 668 मच्छिमारांना परत बोलावून घेण्यात आले आहे.