संतोष पवार
सातारा – शाहूपुरीकरांना मुबलक पाणी मिळावे यासाठी 2015 मध्ये शाहूपुरी पाणी योजनेसाठी 33 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मोठ्या धुमधडाक्यात कामही सुरु झाले. मात्र पाच वर्षे झाली तरी अद्याप ही योजना पूर्णत्वास गेली नाही. त्यामुळे वर्षभरात शाहूपुरीकरांना पाणी देण्याची घोषणा हवेतच विरली असून ग्रामस्थांची पाणी समस्या अद्यापही कायमच आहे.
शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा होत आहे. दिवसेंदिवस शाहूपुरीचा विस्तार वाढत असल्याने नागरिकांना पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. या बाबींचा विचार करुन कण्हेर धरणातून पाणी उचलून ते पाइप लाइनद्वारे शाहूपुरीकरांना देण्यासाठी 2015 साली कण्हेर पाणी योजना उदयास आली. या योजनेसाठी 33 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
कण्हेर धरणातून पाइनलाइनद्वारे पाणी उचलून शाहूपुरी येथे दोन पाण्याच्या टाक्या बांधून अंतर्गत पाइपलाइनद्वारे नागरिकांना पाणी देण्याचे नियोजन या योजनेद्वारे करण्यात आले. निधीची तरतूद झाल्यानंतर या योजनेचे काम मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आले. शाहूपुरीतील अंतर्गत पाइप लाइनचे सुमारे 60 ते 70 टक्के काम गेल्या पाच वर्षांत पूर्ण झाले आहे. दोन पाण्याच्या टाक्यां उभारल्या आहेत. ही योजना एप्रिल 2017 मध्ये पूर्ण करायची होती, मात्र काम अत्यंत संथगतीने सुरु असल्याने पाच वर्षे झाली तरी शाहूपुरीकरांचे मुबलक पाण्याचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही.
संबंधित ठेकेदाराने अंतर्गत पाइप लाइन उरकण्यावर भर दिला. कण्हेर धरणावर पंपहाउस, फिल्ट्रेशन झाल्यामुळे ही योजना लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे होती, मात्र या योजनेला कोणी खो तर घालत नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर पहिले एक वर्षे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना कनेक्शन देण्यात येणार आहे. एक वर्षानंतर ही योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.
कण्हेर पाणी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन शाहूपुरीकरांना मुबलक पाणी मिळण्याची घोषणा करण्यात आली होती. एक वर्षात योजना पूर्ण होईल असे सांगितले जात असताना प्रत्यक्षात पाच वर्षे झाली तरी ही योजना अजून पूर्णत्वास गेली नाही.
कण्हेर पाणी योजनेवरुन सत्तारुढ भैरवनाथ ग्रामविकास आघाडी आणि विरोधी शाहूपुरी विकास आघाडी यांच्यात श्रेयवाद आहे. सत्ताधाऱ्यांनी ही योजना ग्रामपंचायतीच्या मालकीची असल्याचे भासवत मनमानी पध्दतीने पाइपलाइनचे काम केल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.
सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी विरोधी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या सदस्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन देवून कण्हेर योजनेची नवीन कनेक्शन जोडावीत, अशी मागणी केली होती. या योजनेस कोणी तरी जाणीवपूर्वक आडकाठी आणत असल्याचा आरोपही शाहूपुरी विकास आघाडीच्यावतीने करण्यात आला होता. त्यावरुन सत्तारुढ व विरोधकांमध्ये श्रेयवाद उफाळून आला होता. या वादात शाहूपुरीकरांची मात्र पाण्यासाठी ससेहोलपट होताना दिसत आहे.
वाढीव निधीची मागणी
कण्हेर पाणी योजनेसाठी 33 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र अंतर्गत पाइपलाइन पूर्वीपेक्षा वाढत असल्याने वाढीव निधीची मागणी करण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. शाहूपुरी हद्दीतील अंतर्गत पाइपलाइनचे इस्टिमेट करुन निधी दिला असल्याने वाढीव पाइपलाइन नक्की कोठे व कोणी वाढवली? असा प्रश्न निर्माण होत आहे. वाढीव निधी अद्याप तरी मिळाला नसल्याने या योजनेचे काम संथगतीने सुरु असल्याची शाहूपुरीत चर्चा आहे.
कोंडवे हद्दीत कामास ब्रेक?
कण्हेर धरणातून पाइप लाइनद्वारे पाणी शाहूपुरी आणण्यात येत आहे. कोंडवे गावच्या हद्दीत अर्धा किलोमीटर परिसरात पाइप लाइनच्या कामास कित्येक दिवस झाले ब्रेक मिळाला आहे. वन विभागाची परवानगी नसल्याचे कारण पुढे येत आहे. नक्की याठिकाणी पाइप लाइनचे काम का थांबले आहे. या योजनेला कोण आडकाठी आणत आहे का? अशी चर्चा शाहूपुरी परिसरात आहे.