राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लक्ष घालण्याची मागणी
निमसाखर – इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील चौपन्न फाटा ते निमसाखर रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्यासाठी साडेचार कोटीचा निधी मंजूर झाला असूनही रस्ता दुरुस्तीचे काम रखडले आहे. या संदर्भात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
बावडा-बारामती व इंदापूर-बारामती या दोन रस्त्यांना जोडणाऱ्या अनेक रस्त्यांपैकी चौपन्न फाटा हा महत्वाचा रस्ता आहे. चौपन्न फाटा ते निमसाखर दरम्यान रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्याला जागोजागी खड्डे पडले आहेत. साईड पट्ट्याही गायब झाल्या आहेत.
या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या भागातील नागरीकांनी रस्ता व्हावा यासाठी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे कामाबाबत मागणी केली होती. त्यानुसार निमसाखर मध्ये उद्घाटनही करण्यात आले. मात्र उद्घाटन होऊन सहा महिने झाले तरी रस्त्याच्या कडेला मागील काही महिन्यापूर्वी खडीचे ढीग टाकले आहेत.
मात्र अद्यापही दुरूस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. यामुळे आधीच रस्त्याच्या एका बाजूला वड, पिंपळसह अन्य जातीची झाडे अन् दुसऱ्या बाजूला 54 फाटा असल्यामुळे या रस्त्याची रुंदी कमी आहे. अन् त्यात रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. यामुळे विद्यार्थ्यी व वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अधिकारी, ठेकेदाराच्या मनोमिलनाची चर्चा
कळस ते निमसाखर हा रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून रखडला आहे. या रस्त्यावर खडी टाकण्याच्या पुढे हे काम सरकले नाही. हा केवळ अधिकारी व ठेकेदारांच्या मनोमिलनात हा रस्ता रखडला आहे. ठेकेदार, अधिकारी रस्त्याबाबत लक्ष का घालत नाहीत अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे.