सातारा – सदरबझारमध्ये असलेल्या उघड्या कॅनॉलमुळे येथील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा कॅनल बंदिस्त करून या ठिकाणी अद्ययावत गार्डन केली जाणार आहे, अशी ग्वाही महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
सदरबझार येथे आयोजित केलेल्या कोपरा सभेत त बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार अमर साबळे, लोकसभा निवडणूक निरीक्षक प्रवीण साले, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, अविनाश कदम, शंकर माळवदे, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सदस्या सुवर्णा पाटील, माजी नगरसेवक विजय नाफड, भारती सोळंकी, राजेंद्रसिंह राजपूत, रीना भणगे, वसीमभाई सय्यद, बबलू सोळंकी, सुजित जाधव, राहुल किर्दत, चेतन सोळंकी, गणेश भोसले, लतीफ भाई चौधरी, भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी, मारुतराव गायकवाड यांची उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, सदरबझार परिसरातील झोपडीत राहणाऱ्या नागरिकांना पक्की घरे बांधून दिली आहेत, माजी सैनिकांची घरपट्टी माफ केली आहे, शहीद जवानांच्या स्मरणार्थ कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान उभारण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. येथील पाटबंधारेचा कालवा बंदिस्त करावा अशी मागणी वर्षांपासून आहे. हे काम वर्षभरात पूर्ण करू.
खासदार अमर साबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर रोजी देशाला संविधान अर्पण केले होते. हा दिवस संविधान दिन म्हणून भाजप सरकारने घोषित केला. अनेक चांगले निर्णय भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतले आहेत. उदयनराजेंचा मागील पराभव पुसून काढण्यासाठी या निवडणुकीत त्यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रवीण साले म्हणाले, ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये देशाचा राजा इंग्लंडच्या राणीच्या पोटातून जन्माला येतो असे म्हटले जायचे. स्वातंत्र्यानंतर संविधान सादर करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मताच्या पेटीतून राजा जन्माला येईल, असे भाष्य केले होते. मतदारांना राजा करण्याचे काम संविधानाने केले आहे, हे संविधान कोणीही बदलू शकत नाही.
निशांत पाटील म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले यांनी कधीही जाती धर्माचा विचार केला नाही. त्यांनी सर्व जातींसाठी काम केलेले आहे. विरोधकांच्या अफवांना बळी पडून जर आपण चुकीचा निर्णय घेतला तरी ती चूक दुरुस्त करायची संधी पुन्हा मिळणार नाही.
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार
सातारा शहराच्या हद्दवाढीत शाहूपुरी, शाहूनगरसह त्रिशंकू भाग आलेला आहे. शहरात नसतानाही या भागाला चांगल्या सोयी सुविधा देण्यात येत होत्या, आता या भागाचा चौफेर विकास करणार आहे, असा विश्वास महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
शाहूपुरी येथे आयोजित केलेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. माजी खासदार अमर साबळे, सातारा लोकसभा निरीक्षक प्रविण सावे, सातारा जावली विधानसभा प्रमुख अविनाश कदम, शिरीष चिटणीस, बाळासाहेब गोसावी, संजय पाटील, भारत भोसले, राजू गिरीगोसावी, विकास देशमुख, गणेश आर्डे, सुरेश साधले, किशोर गालफाडे मधुकर जाधव, सिद्धार्थ निकाळजे, राजू केंडे, अक्षय जाधव , अजित ग्रामोपाध्ये, शिवप्रसाद वाघमोडे, सुहास वाहाळकर, अंजळकर मॅडम, शरद कदम, तानाजी मोरे, प्रशांत पिलावरे, देवदत्त देसाई, चैतन्य गायकवाड, अक्षय घाडगे, नवनाथ जाधव, तसेच शाहूपुरी, अंबेदरेमधील नागरिक, युवक वर्ग उपस्थीत होता.
उदयनराजे म्हणाले, हा भाग पूर्वीच जर सातारा नगरपालिकेच्या हद्दीत आला असता तर, त्याचा आणखी गतीने विकास करता आला असता. उशिरा का होईना पण शाहूपुरीचा भाग नगरपालिकेत समाविष्ट झाला, यात आनंद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनी फार मोठा निधी दिल्याने शाहूपुरी शाहूनगरसह त्रिशंकू भागाचा विकास झपाट्याने सुरू केला आहे. शहरातील कुठलाच भाग आता विकासापासून वंचित राहणार नाही.
तुमचं मत लाखमोलाच आहे, त्यामुळे मतदानाचा आळस करू नका, असे स्पष्ट करून उदयनराजे म्हणाले, जिल्ह्यातील जनतेने 1999 साली चुकीचा निर्णय घेतल्याने काँग्रेसची सत्ता पंधरा वर्षे आपल्या सर्वांनाच भोगावी लागली आहे. या काळात पूर्णपणे विकास खुंटला होता, आता तसे होऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. देशात स्थिर सरकार देऊन जनतेने आपले कल्याण करून घ्यावे.