वाई – सातारा लाेकसभा मतदारसंघाल महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले असले तरी मीच उभा आहे, असे समजून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी येत्या दोन दिवसांत पायाला भिंगरी बांधून काम करावे. ही जागा जिंकायचीच आहे, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
येथील भाजी मंडईत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्यावतीने आयाेजित महायुतीचे उमेदवार उदयनराजे भाेसले यांच्या प्रचारसभेत ते बाेलत हाेते. याप्रसंगी आ. देवयानी फरांदे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आरपीआय जिल्हाध्यक्ष अशाेक गायकवाड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, नितीन भरगुडे-पाटील, बकाजीराव पाटील, उदय कबुले, शशिकांत पिसाळ, सुनील काटकर, प्रतापराव पवार यांची प्रमुख उपस्थिती हाेती. अजित पवार म्हणाले, मकरंद पाटील यांच्या घरी शुभकार्य असल्यामुळे त्यांना प्रचारात उतरता आले नाही. त्यांनी पहिले रायबाचे लग्न केले, आता ते जाेमाने काेंढाण्याच्या लग्नात सरसावतील. दिवस कमी असले तरी मकरंद पाटील पायाला भिंगरी लावून २४ तास काम करतील याचा मला विश्वास आहे. ही साताराची जागा जिंकायचीच आहे, यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी अजित पवार उभा आहे, असे काम करावे. ही जागा जिंकवा, विकास कामांबाबत माझ्यावर साेपवा. शेती, रस्ते, पाणी, पर्यटनासंदर्भात अनेक याेजना तयार आहेत. वाई विधानसभा मतदारसंघाबराेबरच भविष्यात संपूर्ण सातारा जिल्हा आपल्याला विकासाच्या मार्गावर असल्याचे दिसेल. राजकारणात काही निर्णय हे स्वार्थासाठी नाही तर, जनतेच्या विकासासाठी घ्यावे लागतात. भागाचा विकास करावयाचा असेल तर सत्ताकेंद्र महत्वाचे आहे. त्यामुळे आपला खासदार निवडून येणे महत्वाचे आहे.
खा. उदयनराजे भाेसले म्हणाले, मकरंद पाटील यांनी केलेला विकास सर्वांना माहित आहे. एवढा माेठा विकास हाेण्यासाठी स्थिर सरकारची गरज भासते व त्या सरकारबराेबर आपण असणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीमध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. त्यांच्यामध्ये नियाेजनाचा अभाव आहे. त्यामुळे नियाेजन नसलेले कधीच प्रगती करू शकत नाहीत. जिल्ह्यामध्ये माथाडी कामगार माेठ्या प्रमाणावर आहेत. ते कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून मुंबई येथे काम करत आहे. परंतु, माथाडी कामगारांचा खाेटा कळवळा असणार्या नेत्यालाच भ्रष्टाचारप्रकरणी नाेटीस आली. त्यानंतर कारवाई हाेणार म्हंटल्यावर मतदानापर्यंत जामीन घेतला आहे. ज्या आण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केले. त्याचा मुलगा आज आमच्या विचारांच्याबराेबर आहे. जनतेने ठरवावे भ्रष्टाचार निवडायचा का शिष्टाचार निवडायचा.
येणार्या काळामध्ये आ.मकरंद पाटील यांच्याबराेबर जिल्हयात विकासाचा डाेंगर उभा करणार. मकरंद पाटील यांना केंद्रातून लागणारी सर्व मदत देणार. अजितदादा यांनी नितीन पाटील यांच्यासारख्या तरूण तडफदार नेत्याला याेग्य ती संधी द्यावी, असेही त्यांनी सांगितले. अशाेक गायकवाड म्हणाले, महायुतीचे सरकार आले तर ते संविधान बदलणार असल्याच्या खाेट वावटळ उडवत आहेत. नरेंद्र माेदी हे पहिले पंतप्रधान आहेत, त्यांनी पहिल्यांदा संसदेत गेल्यावर संविधानावर नतमस्तक हाेऊन सांगितले की, हा माझा राष्ट्रगंथ आहे. ते संविधान कसे बदलतील, असा प्रश्न त्यांनी केला. आ. मकरंद पाटील म्हणाले, नितीन काकांना उमेदवारी मिळाली नाही, म्हणून काही कार्यकर्ते व मीही नाराज असल्याच्या बातम्या पसरवण्याचे काम झाले. मात्र, ही निवडणूक आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. दाेन्ही कर्जबाजारी कारखाने बाहेर काढण्यासाठीच अजितदादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी ५०० कोटी थकहमी म्हणून देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. हे प्रत्येक कार्यकर्त्याने विसरता कामा नये. या दोन्ही संस्था वाचवण्यासाठी येत्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांना मोठा मताधिक्याने निवडून द्यायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमाेद शिंदे, बाबूराव संकपाळ, दत्तानाना ढमाळ, अमित कदम यांनी स्वागत केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. अनिल सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रमास संजय गायकवाड, राजेंद्र राजपुरे, प्रमोद शिंदे, शामराव गाढवे, दिलीप पिसाळ, दीपक ओसवाल, प्रणित पिसाळ, मदन भोसले, यशवंत जमदाडे, भैय्या डोंगरे, बापूसाहेब जमदाडे, सीमा जाधव, किरण साबळे, मनीषा घेसास, राजेंद्र तांबे, विशाल तोष्णीवाल, स्मिता देशमुख, राजेंद्र लावंघरे, बाळासाहेब चिरगुटे, विमल पार्टे तसेच वाई, खंडाळा, महाबळेश्वर येथील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय व सर्व मित्र पक्षांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नितीन पाटील खासदरा होणार- अजितदादा
नितीन पाटील यांचे भवितव्य उज्जवल आहे. त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून घेणार असल्याचे अजितदादा यांनी सांगितले. नितीनकाकांचे काम चांगले आहे. त्यांनी कामाला लागावे. आपण भविष्यातील खासदार असू, सातारा जिल्हाभर तुम्हाला काम करायचे आहे, असे अजित पवार यांनी सूचित केले.