पुणे – शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेईल, ते महत्वाचे ठरणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षांनी बजाविलेल्या “व्हीप’ची अंमलबजावणी करणे आमदारांना बंधनकारकच असते. “व्हीप’ न पाळल्यास विधीमंडळाचे अध्यक्ष त्यावर योग्य तो निर्णय घेऊ शकतात, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, विधीमंडळाच्या अधिवेशनात बंडखोर आमदारांमधील काही जणांचे मतपरिवर्तन होईल, असे ऐकण्यात आले. सुरत, गुवाहाटी, गोवा या ठिकाणी बंडखोर आमदार गेले. त्यांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असेही पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेनेचे काही प्रमुख नेते एकत्र बसून विधीमंडळाच्या अधिवेशनातील काही मुद्यांबाबत चर्चा करून निर्णय घेणार आहेत. विरोधी पक्षनेता कोणाला करायचे यावरही चर्चा करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
राज्यपालांनी पेढा भरवताना कधी पाहिले नाही
लगबगीने उरकलेल्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांनी चुकीच्या पद्धतीने काही नावे घेत शपथ घेतली. मात्र, त्यावर राज्यपालांनी हरकत घेतली नाही. गेल्या अनेक वर्षात आम्हीही बऱ्याचदा मंत्रीपदाची शपथ घेतली. पण, राज्यपालांनी कोणाला फुलांचा गुच्छ दिला, पेढा भरवला, असे यापूर्वी कधीही पाहिलेले नाही, असे पवार यांनी सांगितले.