पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “वेगाने विकसित होणाऱ्या शहराच्या पश्चिम भागाचे प्रवेशद्वार आणि शहराच्या हद्दीलगत जाणाऱ्या पुणे- बंगळुरू आणि पुणे- मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केंद्रशासनाच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेला चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्प पथदर्शी ठरेल, त्यामुळे शहराच्या विकासचक्राला गती मिळेल,’ असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
मोहोळ यांच्या प्रचारार्थ कोथरूड विधानसभेतील भेलकेनगर, गुजरात कॉलनी, आझादनगर, शास्त्री नगर, सुतारदरा, जय भवानीनगर, रामबाग कॉलनी, हनुमाननगर मार्गे मेगा सिटी परिसरात प्रचार फेरीचा समारोप झाला. यावेळी त्यांनी या भागातील नागरिकांंशी संवाद साधला.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार संजय काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, मनसेचे नेते किशोर शिंदे, सुधीर धावडे, डॉ. संदीप बुटाला, माजी नगरसेविका छाया मारणे, वासंती जाधव, अल्पना वरपे, डॉ. श्रद्धा पाठक, दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, “शहर आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी मी महापौर असताना केली होती.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाला. त्याच धर्तीवर गतिमान, सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी शहराच्या विविध भागात २१ ठिकाणी उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल किंवा ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहेत. शहराच्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी आणि अन्य प्रकल्पांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या दोन हजार कोटी रुपयांच्या तरतुदीतून ही कामे केली जाणार आहेत.’
पहिला दुमजली उड्डाणपूल
“नळस्टॉप चौकात मेट्रो आणि महापालिकेचा संयुक्त प्रकल्पातून उभारलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी दुमजली उड्डाणपुलामुळे कर्वे रस्ता परिसरातील वाहतूक सुसह्य झाली आहे. पुण्यातील हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल असून, पुलावरून चार पदरी वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा आणि प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत झाली आहे,’ असा दावा मोहोळ यांनी केला.