प्रीतम पुरोहित/ ज्ञानेश्वर फड
फलटण – संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा शनिवारी (दि.2) फलटण मुक्कामी होत. या पालखी सोहळ्यात सुमारे चार लाखांवर भाविक सहभागी आहेत. अशावेळी त्यांच्या सेवा, सुविधा आणि परिसर स्वच्छतेसाठी स्वयंसेवकांची आवश्यकता असते. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेची (एनएसएस) दिंडी 2005 पासून वारी सोहळ्यात सहभागी होत आहे.
यंदा या “एनएसएस’ दिंडीत महाराष्ट्रातून 8 विद्यापीठांतील 170 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या माध्यमातून या विद्यार्थी स्वयंसेवकांनी आजवर विविध विषयांवर प्रबोधन आणि सर्वेक्षण केले आहे. स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी अशा थीमवर आधारित विद्यार्थ्यांकडून पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते. तसेच हे विद्यार्थी वारकऱ्यांची मनोभावे सेवा करतात. यावर्षी “लोकशाही वारी’ या थीम अंतर्गतदेखील वारकऱ्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे. पुणे ते पंढरपूर माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत ही दिंडी चालते.
“एनएसएस’ दिंडीत सहभागी असलेले शरदचंद्र पवार महाविद्यालय जेजुरी येथील प्राध्यापक डॉ. राजकुमार रिकामे म्हणाले, “दरवर्षी वेगवेगळी थीम ठरवून त्याप्रमाणे सेवा केली जाते. यावर्षी स्वच्छतेसोबतच “लोकशाही वारी’ संकल्पना मांडण्यात येत आहे. यातून मतदानाबाबत जागृती करणे हा हेतू आहे. साधारणपणे या विद्यार्थ्यांच्या तोंडी हिंदी सिनेमाची गाणी असतात. मात्र, 20 दिवस वारीत चालून वारकऱ्यांची सेवा करत भजन-कीर्तन ऐकून ते अभंगही गायला लागतात. वारीतील पथनाट्यांत सहभाग घेतल्याने त्यांचे “स्टेज डेअरिंग’ वाढते आणि त्यांचा सर्वांगिण विकास होतो. निष्काम भावनेने विध्यार्थी सेवा करतात. डॉ. विकास कर्डिले, डॉ. संदीप देशमुख, डॉ. वैशाली वाघुले, प्रा. शालिनी घुमरे, दिनेश जाधव, स्वामीराज भिसे, ऋषिकेश चव्हाण हे दिंडीत सहभागी असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.’
विद्यार्थी म्हणतात…
“वारकऱ्यांची सेवा करताना खूप आनंद वाटतो. कोणतेही काम करताना कसलाही कमीपणा वाटत नाही. कचरा उचलणे, स्वच्छता करणे, वारकऱ्यांना हवी ती मदत करणे, पालखीला मानवी साखळी तयार करून गर्दीवर नियंत्रण मिळविणे अशी सेवा आम्ही करतो,’ अशा भावना या विद्यार्थ्यांनी “प्रभात’शी बोलताना व्यक्त केली.
“एनएसएस’ दिंडीचे कार्य आणि वैशिष्ट्ये…
-वारीमार्गावरील गावांचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण
-स्वच्छता मोहीम
-लोकशाही व मतदान जनजागृती अभियान
-पथनाट्याच्या माध्यमातून लेक वाचवा अभियान
-पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची हात आणि पायाची मालिश
-पोलीस मित्र म्हणून मदत
-वारीतील अर्थकारण, उद्योजकता, दिंड्याचा इतिहास, वारीतील व्यवस्थापन, महिला सबलीकरण या विविध विषयांवर विद्यार्थ्यांचा वारकऱ्यांशी संवाद
-आपत्कालीन स्थितीत मदतकार्य