बारामती: ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत विशेष पुरस्कार जाहीर झालेल्या ‘लता भगवान करे, एक संघर्षकथा’ या चित्रपटाच्या नायिका लता करे, दिग्दर्शक नवीन देशबोईना, गीतकार-संगीतकार प्रशांत महामुनी, गायिका गिरीजा महामुनी यांचा राज्याच्या प्रौढ व अल्पसंख्यांक शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांचे हस्ते बारामतीत रविवारी गौरव करण्यात आला.
दाक्षिणात्य निर्माते ए कृष्णा अरुबोधू यांची ही निर्मिती असून नवीन देशबोईना यांनी दिग्दर्शन केले आहे. कार्यकारी निर्माता अतुल साबळे, निर्मिती व्यवस्थापक प्रविण बर्गे असून प्रतिक कचरे यांनी स्थिरचित्रण केले आहे.
‘सागरातली वाट तुफानी अडविते नौकेला…
नाविक कणखर मार्ग काढितो चुकवूनि त्या लाटेला…
ध्येय मनीचे गाठायाचे प्रयत्नपूर्वक तुजला…
जायचे क्षितिजा पल्याड तुजला…’
हृदयविकारग्रसस्त पतीच्या उपचारासाठी अनवाणी पायाने मॅरेथॉन स्पर्धा धावणाऱ्या व जिद्दीने जिंकणाऱ्या 65 वर्षीय अत्यंत गरीब महिलेची ही सत्यकथा आहे.लता करे यांच्यासह त्यांचे जीवनचरित्र गीतातून शब्दबद्ध करणारे अकलूज येथील अंध गीतकार- प्रशांत महामुनी, तितक्याच ताकदीने सुरेल आवाजात हे स्फुर्तीगीत गाणारी गायिका गिरीजा महामुनी, दिग्दर्शक नवीन देशबोईना, सुनेची भूमिका करणारी कलाकार राधा चव्हाण,प्रतिक कचरे या सर्वांचा बारामती जवळील जळोचीतील माळी मळा येथे करे यांच्या घरी या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी लता करे यांचे पती भगवान करे, ज्योती क्षीरसागर, रुचिता क्षीरसागर, विश्वनाथ माने, विठ्ठल साळवे, बाळासाहेब वाघमारे यांची उपस्थिती होती. प्रशांत महामुनी यांनी या चित्रपटासाठी नेईल तुला शिखरावरती तुझीही पाऊल वाट….आणि जायचे क्षितिजा पल्याड तुजला ही दोन स्फूर्तिदायक गीते लिहिली असून दोन्ही गीते त्यांची कन्या गिरीजा हिने गायली आहेत. लवकरच राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
उपसंचालक क्षीरसागर म्हणाले,लता करे यांनी स्वतःसह मराठी चित्रपटाचा नावलौकिक वाढविला आहे, त्यांच्या चित्रपटाची थेट राष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्याने हिंदीतही या चित्रपटाचे डबिंग होणार आहे. संगीतकार-गीतकार प्रशांत महामुनी व गायिका गिरीजा महामुनी यांचेही चित्रपटात महत्वाचे योगदान आहे.
दिग्दर्शक नवीन देशबोईना म्हणाले,हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचला आहे.स्वत:च्या जीवनावर चित्रीत झालेल्या,त्यात स्वतः नायिका म्हणून काम केलेल्या लता करे या एकमेव व्यक्ती आहेत.राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्याने अडीच-तीन वर्षे केलेल्या परिश्रमाचे चीज झाले आहे.
आमच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्याची गरज…
तीन मुली व एका मुलासह आम्ही विदर्भातून बारामतीला आलो,तीन्ही मुलींची लग्ने झालीत, मुलगा दहावी झाला असून पाटसला खाजगी कंपनीत तुटपुंज्या पगारावर चौकीदार म्हणून काम करतो.आम्ही इथे सिंगल खोलीत भाड्याने राहतो.अनेकजण कार्यक्रमास बोलावतात, अनेक सत्कार-पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय पुरस्काराचा आनंद आहेच, त्याहीपेक्षा आम्हाला आर्थिक स्थैर्याची व आधाराची गरज आहे.