मुंबई : राज्यातील लेटरबॉम्ब प्रकरणामुळे एकच गोंधळ निर्माण झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, राज्यातील या गोंधळाची दखल दिल्लीच्या केंद्रीय गृहसचिवांनी घ्यावी या मागणीसाठी आज विरोधक दिल्लीत दाखल झाले आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी देवेंद्र दिल्लीमध्ये गृहसचिवांची भेट घेऊन फोन टॅपिंग अहवाल सादर केला आहे. दरम्यान या भेटीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली असून फोन टॅपिंग अहवाल म्हणजे भिजलेला फटाका असल्याचा टोला लगावला आहे. अहवालात काही दम नसून त्याला काडीचीही किंमत नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. “दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्याने यायला पाहिजे. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असायला हवा आणि त्यादृष्टीने विरोधी पक्षनेते येत असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं. काहीतरी कागद घेऊन आले आणि गृहसचिवांना भेटले अशा बातम्या पाहिल्या. तो कागद काही गंभीर नाही. विरोधी पक्षाच्या हातातील कागद गंभीर आहे की नाही हे सरकार ठरवणार. त्या अहवालात काडीचाही दम नाही. तो अहवाल जाहीर करावा, त्यात सरकारला अडचणीत आणेल असं काही नाही. त्याची काय दखल घ्यायची हे मुख्यमंत्री ठरवतील,” असे संजय राऊत यांनी म्हटले.
“तो जो काही बॉम्ब घेऊन विरोधी पक्षनेते आले होते तो भिजलेला लवंगी फटाका आहे. त्या फटाक्याला वातसुद्धा नव्हती. आम्ही दिल्लीत कुठे स्फोट झाला, महाराष्ट्रात काही पडसाद उमटतात का पाहत होतो. पण तसं काही दिसलं नाही. बंगालप्रमाणे महाराष्ट्र आणि दिल्लीत ‘खेला होबे’ सुरु आहे. यामुळे लोकांचं चांगलं मनोरंजन होत असून त्यासाठी कोणता मनोरंजन टॅक्सही भरायची गरज नाही,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
“काही चुकीचं झालं असेल तर त्यासाठी महाराष्ट्रातील गृहखातं सक्षम आहे, त्यासाठी केंद्रात येण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते हे महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आले आहेत. त्यांनी त्यांच्याकडील सगळा डाटा घेऊन मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा केली तर महाराष्ट्राची भ्रत राहते. पण त्यात काही दम नसल्याने ते दिल्लीत आले. दिल्लीत अशा प्रकारचे भिजलेले फटाके वारंवार वात लावून फोडण्याची दिल्लीला सवय आहे. आम्ही याकडे गंमत म्हणून पाहत आहोत. पुढचा सिनेमा तो कोणता तयार करतायत याकडे आम्ही पाहतोय,” असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.