मुंबई – पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांच्याकडील गृहखातं जाणार किंवा मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र अनिल देशमुख सेफ राहिले आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली. बदलीमुळं नाराज झालेल्या परमबीर सिंग यांनी खळबळजनक आरोप केले आहे.
यातच या मुद्यावरून पुन्हा एकदा विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतरही ठाकरे सरकार विरोधकांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केले आहे. भाजप नेते यासंदर्भात राजभवनात पोहोचले आहेत.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तसंच गेल्या काही दिवसांतील घटनांकडे राज्यपालांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून करण्यात येणार आहे. या सगळ्या संदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा आणि तो राष्ट्रपतींना पाठवावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आलीय. भाजपच्या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे.
दरम्यान,उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक आढळल्यापासून राज्याचं राजकारण तापलं आहे. त्यातच वाझे यांच्या चौकशीमुळे सरकार अडचणीत आलं असताना परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडली आहे.