संतोष पवार
गंजक्या, सडक्या पाइपलाइनमुळे आरोग्य धोक्यात; जीवन प्राधिकरणाच्या कारभाराने संताप
सातारा – शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत पाणी समस्या ही मोठी गंभीर समस्या कायमच राहिली आहे. सुमारे 35 ते 40 वर्षांपूर्वीच्या गंजक्या, सडक्या पाइपलाइनद्वारे आजही शाहूपुरीकर पाणी पित आहेत. अनेक पाइप गटारातून नेण्यात आल्याने शाहूपुरीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे खंडित पाणी पुरवठा, विस्कळित पाणी पुरवठा अशी शाहूपुरीची ओळख होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
शाहूपुरी ग्रामपंचायतीची स्वत:ची पाणी पुरवठा योजना नसल्याने शाहूपुरीकरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या परिसरात पूर्वीपासून असलेल्या वसाहतींमध्ये 35 ते 40 वर्षांपूर्वीच्या पाइप लाइन अखेरच्या घटका मोजत आहेत. अनेक ठिकाणी पाइप गंजक्या व सडक्या अवस्थेत आहेत. जिल्हा परिषद कॉलनी, गडकरआळी आदी भागात तर खळखळत्या गटारातच पाणी पुरवठ्याच्या पाइप आहेत.
त्यामुळे रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. कण्हेर पाणी योजना 2017 साली पूर्ण होणार असल्याने जुन्या पाइपलाइनकडे दुर्लक्षच झाले. मात्र 2020 आले तरी अद्याप कण्हेर योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. शाहूपुरीची लोकसंख्या वाढली, विस्तार वाढल्या मात्र जीवन प्राधिकरणाचा कारभार काही सुधारला नाही. आजही शाहूपुरी चौक, आंबेदरेरोड, गेंडामाळनाका, गणेशनगर, शिवाजीनगर, सुयोग कॉलनी, समता पार्क, श्री स्वामी समर्थ मठ परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी गळतीची समस्या निर्माण होत आहे.
अनेकदा पाणी पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. खंडित व विस्कळित पाणी पुरवठा हे जणू शाहूपुरीला लागलेले ग्रहणच आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाण्याची बिले भरमसाठ निघत असताना त्या तुलनेत शाहूपुरीकरांना पाणी किती मिळते, याबाबत हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक आवाज उठवतात. सत्ताधारी आणि विरोधकांनी शाहूपुरीकरांना मुबलक पाणी देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
कोणालाही पाठीशी न घालता अन्यायाला वाचा फोडण्याची गरज आहे. सातारा शहरालगतच्या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीतील नागरिकांना 21 व्या शतकातही पाण्यासाठी आंदोलने करावी लागतील, ही गोष्ट न पटणारी आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आवाज उठवण्याची गरज आहे.
पाणी गळतीची समस्या खूप गंभीर असून आजही शाहूपुरीकरांना मुबलक पाणी मिळत नाही.
जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना याचे काही देणे – घेणे नाही. अनेक ठिकाणच्या गळती काढण्याचे काम ठेकेदारांच्या सोयीनुसार होत आहे. जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण शाहूपुरीचा सर्व्हे करुन येथील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याची गरज आहे. अधिकारी – जनता समन्वय होताना दिसत नाही. त्यामुळे अनेकदा वादावादीचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांप्रमाणे प्राधिकरणाच्यावतीनेही तक्रार निवारणासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रीडिंगची बोंब… तरीही बिले भरमसाठ
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या पाणी मीटरचे रिडींग घेणे व बिल वाटण्याची कामे खासगी ठेकेदारांमार्फत होत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये ठेकेदारच नसल्याने रिडिंग वेळच्या वेळ घेतले जात नव्हते. त्याचप्रमाणे पाण्याची बिलेही नागरिकांना सहा – सहा महिने मिळाली नव्हती. त्यातच कहर म्हणजे शाहूपुरीतील पाण्याची बिले पाटण तालुक्यातील एका ओढ्यात आढळून आली होती. या सर्व बाबी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना माहिती असतानाही कार्यालयात बसून भरमसाठ बिले काढण्यात येत आहेत. वाढीव बिलाच्या मुद्यावरुन शाहुपुरीकरांमध्ये असंतोषाचे वातावरण असून बिले कमी करुन द्यावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
बेकायदा नळ कनेक्शनचा सुळसुळाट
शाहूपुरी ग्रामपंचायतीचा ज्या गतीने विस्तार झाला त्या गतीने येथे मूलभूत सुविधा मिळत नाहीत. अनेक वसाहतीत नागरिकांनी लोकवर्गणी काढून पाण्याची पाइप लाइन टाकल्याने अनेक भागात प्राधिकरणाचे पाणी आले. मात्र याच पाइप लाइनवर अनेक ठिकाणी ठेकेदार बेकायदा कनेक्शन देत आहेत. शाहूपुरीत सर्वाधिक बेकायदा पाणी कनेक्शन असल्याचे शाहूपुरीकर उघड – उघड बोलत आहेत. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून ठेकेदारांची मुजोरा या विभागात जास्त वाढली असून ते ठरवतील ती पूर्व दिशा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बाहेरच्या बाहेर बेकायदा कनेक्शनचा बाजार मांडला जात असून याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी काय कारवाई करणार असा प्रश्न शाहूपुरीकरांमधून होत आहे.