खून, बलात्कार, घरफोडी, फसवणूक गुन्हेगारी पाय रोवून उभी
राजगुरूनगर – खेड तालुक्यात गेली दहा वर्षांत गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे. आहे त्या पोलीस बळावर तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यात पोलीस यशस्वी असले तरी अजूनही अनेक गुन्ह्यांची उकल झालेले नाही. खून, दिवसा व रात्रीची घरफोडी, बलात्कार, विनयभंग, चैन स्नॅकर, फसवणूक आदी गुन्हेगारी पाय रोवून उभी आहे. तालुक्यात जसे औद्योगिक क्षेत्र वाढत आहे त्याप्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. खेड, आळंदी, चाकण पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हेगारी वाढली आहे. अलीकडे चाकण आणि आळंदी पोलीस ठाणे पिंपरी आयुक्तालयाच्या अंतर्गत गेल्याने इथे मोठा पोलीस फौजफाटा उपलब्ध झाला आहे; मात्र राजगुरूनगर पोलीस ठाण्यात अपुऱ्या पोलीस बळाअभावी गुन्हेगारी, वाहतूककोंडी आदी संकटाना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
खेड तालुक्यात चाकण, आळंदी आणि आता राजगुरूनगर परिसरात औद्योगिक क्षेत्रात वाढ झाली आहे. चाकणची एमआयडीसी, आळंदीजवळील मरकळ येथे आलेल्या विविध कंपन्या आणि आता राजगुरूनगर जवळ झालेल्या सेझमधील कंपन्या यांमुळे तालुक्यात देशी-परदेशी, परप्रांतीयांचे लोंढे आले आहेत. त्यामुळे तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. जशी लोकसंख्या वाढत आहे, त्याच प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. खेड तालुक्यात तीन ठिकाणी औद्योगिक क्षेत्र आहे. शिवाय आळंदी, श्री भीमाशंकर ही मोठी तीर्थक्षेत्र आहेत.
याबरोबरच निमगाव, कडधे, आणि खरपुडी गावातील कुलदैवत असलेला जागृत देवस्थाने आहेत, त्यामुळे गर्दीचा ओघ मोठा आहे. एवढेच काय तर तालुक्यातून जाणारा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग अरुंद असल्याने राजगुरूनगर, चाकण येथे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने अर्धे पोलीस बळ वाहतूककोंडी सोडविण्यात जात आहे, त्यामुळे दररोजचे घडणारे गुन्हे आणि तपास यंत्रणा यात मोठा फरक होत आहे.
गृहविभाग दखलच घेत नाही
अपुऱ्या पोलीस बळामुळे तालुक्यात अनेक घटना घडत असताना पोलिसांना त्या घटनांचा छडा लावण्यात उशीर लागत आहे, तर गुन्हेगारी वाढत असताना त्यावर अंकुश राहण्यासाठी पुरेसे पोलीस बळ असणे अपेक्षित आहे. याबाबत अनेकदा वरिष्ठ पातळीवर स्थानिक, सामाजिक आणि पोलीस खात्याकडून पोलीस बळ मिळण्याची मागणी होत आहे. मात्र, गृहविभागाकडून याची दखल घेतली जात नाही. अपुऱ्या पोलिसांवर कामाचा मोठा ताण आला आहे.
धामणेतील खुनाचा छडा नाहीच
चाकण आळंदी येथील गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी चाकण एमआयडीसीमध्ये नव्याने पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे. या भागात गुन्हेगारी असली तरी ती पुरेशा पोलीस अधिकारी, पोलीस कमर्चाऱ्यांमुळे आवाक्यात आहे; पण अनेक जुन्या गुन्ह्याची उकल होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. धामणे येथील तरुणीचे खून प्रकरण राज्यात गाजले; मात्र तिच्या खुनाचे आरोपी अजूनही सापडले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
107 गावांसाठी केवळ 25 ते 28 पोलीस राजगुरूनगर (खेड) पोलीस ठाण्याच्या अंतर्गत तब्बल 107 गवे येत असून, पोलीस संख्या अवघी बोटावर मोजण्याइतकी आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. खेड पोलीस ठाण्यांतर्गत 107 गावांत एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह 48 पोलीस कर्मचारी कायदा सुव्यवस्था राखत आहेत. यातही 5 पोलीस वाहतुकीकोंडी सोडविण्यासाठी, 4 पोलीस लॉकअपसाठी, 5 पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात, 2 पोलीस कोर्टकामासाठी, एक पोलीस निर्भया पथकाचे काम करीत असल्याने 107 गावांसाठी केवळ 25 ते 28 पोलीस इतर कामासाठी उपलब्ध असतात. त्यांना 107 गावांमध्ये कायदा सुव्यवस्था ठेवणे अवघड झाले आहे.