सातारा – महाराष्ट्रात सत्ता गमावली असली तरी भाजपने संघटन बांधणीचे “मिशन कमळ’ सोडलेले नाही. सातारा जिल्ह्यात पक्षाचे संघटनात्मक कार्य सुरू असताना शहरात मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त कार्यालय असावे, अशी मागणी पुन्हा पुढे आली आहे.
हे कार्यालय पक्षाच्या स्वमालकीच्या जागेत असेल, की भाड्याने घेतले जाईल, हे स्पष्ट झालेले नाही. प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर कार्यालयाच्या मागणीला मूर्त रूप येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्रात भाजपला बसलेल्या “राजकीय सेटबॅक’ने अनेकांची विमाने जमिनीवर आली आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीने लगेचच नोव्हेंबर 2019 मध्ये बूथप्रमुख ते प्रदेशाध्यक्षपदापर्यंतच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात प्रदेशाध्यक्षपदाची निवड रविवार, दि. 16 रोजी होणार आहे. या निवडीनंतर पुन्हा “मिशन कमळ’ अंर्तगत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लढवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
लोकसंपर्कासाठी साताऱ्यात मध्यवर्ती कार्यालय असावे, अशी मागणी पुढे आली असून जागेसाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी एकाच पद्धतीची व रचनेची चारशे कार्यालये उभी करण्याचा संकल्प सोडला होता. त्यानुसार जिल्हा भाजप कार्यकारिणीने जरंडेश्वर नाक्याच्या जवळ 42 गुंठे जागा जिल्हा कार्यालयासाठी खरेदी केली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता गेल्याने कार्यालय विस्ताराचा कार्यक्रम भाजपला बाजूला ठेवावा लागला होता.
जिल्हा नाही तर किमान शहर कार्यालयाला तरी मूर्त स्वरूप यावे, असा आग्रह झाल्याने शहरात मोक्याच्या जागेची शोधमोहीम सुरू आहे. पोवई नाक्यावर जागा मिळवण्यास सर्वाधिक पसंती असून केसरकर पेठ, शाहू चौक किंवा राजपथावर कार्यालय उभारण्याचा कार्यकर्त्यांचा मानस आहे. भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्यांमध्ये जागेअभावी आणि राजकीयदृष्ट्या सोयीचे म्हणून साताऱ्यापेक्षा कराडला नेहमीच झुकते माप मिळाले आहे. जिल्ह्याचे प्रमुख केंद्र असलेल्या साताऱ्यात शहर कार्यालयासाठी पसंतीच्या जागेचा प्रस्ताव पाठवला जावा, अशी सूचना प्रदेश कार्यकारिणीकडून आली आहे.
कार्यालय “कॉर्पोरेट’ हवे
भाजपला साताऱ्यात स्वतंत्र बैठका घेण्यासाठी सर्किट हाउस किंवा सोमवार पेठेतील दैवज्ञ मंगल कार्यालय यांना सध्या तरी पर्याय नाही. त्यामुळे साताऱ्यात पक्ष कार्यालय असणे गरजेचे आहे. भवानी पेठेत कन्याशाळेसमोर एका जुनाट इमारतीत पूर्वी भाजपचे कार्यालय होते. तेव्हा भाजपचा विस्तार तितका मोठा नव्हता. मात्र, आता भाजपला “कार्पोरेट लूक’ असलेले कार्यालय हवे आहे. मात्र, त्याबाबत प्रदेश कार्यकारिणीकडून गाइडलाइन्स येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.