Team India (T20 world cup & IPL 2024) : बीसीसीआयने T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे, तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांनाही आपली छाप सोडण्याची संधी असेल. भारतीय संघाच्या निवडीसाठी निवडकर्त्यांनी आयपीएल 2024 च्या कामगिरीचाही मोठ्या प्रमाणावर विचार केला आहे. त्यामुळे संजू सॅमसन आपल्या फॉर्मच्या जोरावर संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. BCCI ने IPL 2024 मधून टी-20 विश्वचषक संघात कोणत्या संघातील किती खेळाडूंची निवड केली आहे हे आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये त्या 4 खेळाडूंचाही समावेश आहे ज्यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.
मुंबई इंडियन्सचे 4 खेळाडू..
T20 विश्वचषकासाठी मुंबई इंडियन्सच्या 4 खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. विश्वचषकात रोहित शर्मा भारताचे कर्णधार असेल, तर हार्दिक पांड्या उपकर्णधार असेल. त्याच्याशिवाय टी-20 क्रिकेटमधील जागतिक क्रमवारीत नंबर 1 फलंदाज सूर्यकुमार यादवलाही विश्वचषक संघात प्रवेश मिळाला आहे. तर एमआयचा जसप्रीत बुमराह 1 जूनपासून सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभात भारतीय संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज असेल.
राजस्थान रॉयल्सचेही 4 खेळाडू
राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2024 मध्ये वर्चस्व राखले आहे, आतापर्यंत खेळलेल्या 9 पैकी 8 सामने जिंकले आहेत. RR कर्णधार संजू सॅमसनची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे, तर यशस्वी जैस्वालला रोहित शर्मासोबत सलामीची संधी मिळेल. त्याच्याशिवाय पर्पल कॅपच्या शर्यतीत असलेला लेगस्पिन गोलंदाज युजवेंद्र चहलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. आवेश खान 15 खेळाडूंमध्ये नसून त्याला प्रवासी राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे.
दिल्लीचे 4 खेळाडू माजवतील खळबळ…
दिल्ली कॅपिटल्सच्या 4 खेळाडूंनाही स्थान देण्यात आले आहे. ऋषभ पंत हा भारतीय संघातील दुसरा यष्टिरक्षक आहे. त्यांच्याशिवाय अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्या रूपाने दोन फिरकी गोलंदाज भारतीय संघाला मजबूत करणार आहेत. तर खलील अहमदला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे.
RCB आणि CSK च्या प्रत्येकी 2 खेळाडूंचा समावेश
विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांची आरसीबीमधून निवड झाली आहे. कोहली आयपीएल 2024 मध्ये ऑरेंज कॅपधारक आहे आणि त्याने आतापर्यंत 500 धावा केल्या आहेत. सिराजचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे, रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांच्या रूपाने चेन्नई सुपर किंग्जचे 2 अष्टपैलू खेळाडू भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्यात योगदान देणार आहेत.
तीन संघांमधून ( PBKS, KKR,GT) प्रत्येकी एका खेळाडूची निवड
पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्सच्या प्रत्येकी एका खेळाडूचा संघात समावेश करण्यात आला आहे. पीबीकेएसकडून अर्शदीप सिंगला अंतिम 15 खेळाडूंमध्ये प्रवेश मिळाला आहे. जीटीचा कर्णधार शुभमन गिल आणि केकेआरचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंग यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.