सातारा -संघटनेचा बुरखा घेऊन सभासदांना विशेषतः महिला आणि सेवानिवृत्तांना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीला बॅंकेतून हाकलून लावा, असा घणाघात सभासद परिवर्तन पॅनेलचे नेते बलवंत पाटील यांनी केला. बॅंकेच्या आणि सभासदांच्या हिताचे रक्षण करण्यासाठीच ज्येष्ठ शिक्षक नेते संभाजीराव थोरात, शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे तसेच दोंदे गटाचे दीपक भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसमावेशक, संघटना निरपेक्ष पॅनेल तयार करण्यात आले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा अनुभव विचारात घेता संघटनेच्या नावाखाली कोणीही विरोधकांना जोगवा देणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री. पाटील यांनी म्हटले आहे की, “”आपापल्या संघटनेवर शिक्षक सभासदांचे प्रेम असते. त्यामुळेच संघटनेचे नाव घेऊन सभासदांना भावनिक आवाहन करता येते, असे सत्ताधाऱ्यांना वाटते. परंतु, बॅंक आणि सभासदहित ही भावनिक बाब नसून तो व्यावहारिक मुद्दा आहे. सभासद सुज्ञ असून त्यांना ही गोष्ट पटली असल्यामुळे भावनेच्या आधारे सत्ताधाऱ्यांना निवडून देण्याची चूक सभासद पुन्हा करणार नाहीत. सत्ताधाऱ्यांनी आवश्यकता नसताना नातेवाइकांची नोकरभरती केली.
मात्र, त्यांच्या पगाराचा बोजा सभासदांच्याच खांद्यावर पडत आहे. त्यामुळे केवळ संघटनेचे नाव पुढे केले म्हणून ते आपल्याला मत देतील, या भ्रमात सत्ताधाऱ्यांनी राहू नये. बॅंक ही सभासदांच्या घामाच्या पैशांवर उभी राहिली असून सत्तेवर असलेल्या व्यक्तीने विश्वस्त म्हणून काम करणे अपेक्षित आहे. परंतु, माझ्या राजीनाम्यानंतर विरोधकांचा मनमानी कारभार सभासदांनी पाहिला आहे. अनावश्यक वस्तूंच्या खरेदीमुळे व्यवस्थापन खर्चात झालेल्या वाढीचा फटका अंतिमतः सभासदांनाच बसला आहे.” करोना काळातही लाखोंचे भत्ते सत्ताधाऱ्यांनी घेतले. शिवाय एक कोटीचा “किरकोळ’ खर्च केला. दरमहा लाखो रुपयांचा चहा पिणाऱ्यांना आमचे कपबशी हे चिन्हच आता धडा शिकवेल, असेही श्री. पाटील यांनी म्हटले आहे.
बॅंकेच्या चेअरमननेच नियमबाह्य कर्ज काढल्याचे उघड होत असेल तर केवळ संघटनेच्या नावाखाली बॅंकेचा कारभार सभासदांनी पुन्हा त्यांच्याच हाती का द्यावा, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. नेट बॅंकिंगची सुविधा देण्याच्या नावाखाली एजन्सीवर वारेमाप खर्च केला. परंतु, नेट बॅंकिंग दूरच, साधे एटीएमसुद्धा अजून बॅंकेत आले नाही. कर्मचारी संख्या मोठी असली तरी त्यातील एकाही कर्मचाऱ्याला नेट बॅंकिंगसंदर्भातील तांत्रिक ज्ञान नाही.
सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांपैकी एकही पूर्ण होऊ शकले नाही. कर्जावरील व्याजदर चौदा वेळा कमी केल्याचे विरोधक सांगत असले, तरी त्यातील सात कपाती माझ्या कारकीर्दीत झाल्याचे ते शिताफीने लपवतात. उर्वरित कपाती कोविड काळात ठेवींवरील व्याजदर कमी झाल्यामुळे अपरिहार्यपणे कराव्या लागल्या. व्यवस्थापन खर्च कमी करून व्याजकपात करणे स्वार्थी प्रवृत्तींना कधीच जमले नाही, असे श्री. पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
नियमभंगाची त्यांना शिक्षा मिळेल
बॅंकेची नियमावली सभासद आणि पदाधिकारी या सर्वांसाठी एकसारखी असताना चेअरमनना नियमबाह्य लाखो रुपयांचे कर्ज देण्यात आले आणि त्याचा हप्ता मात्र शेकड्यात आहे. हा नियमभंग नव्हे का, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.या व्यवहाराची “झाकली मूठ’ राहावी म्हणून विरोधकांनी कोणकोणत्या कसरती केल्या, कोणाकोणाच्या खांद्यावर बंदुका ठेवल्या, हे सर्वज्ञात आहे. या सर्वच प्रकाराची पोलखोल झाली असल्याने सभासद मतपेटीद्वारे योग्य तो निवाडा करतील आणि निर्णय घेण्यात त्यांना संघटनेच्या नावाचा अडसर येणार नाही, अशी खात्रीही पाटील यांनी व्यक्त केली.