आंबेगावच्या पूर्व भागात दहशत : जन जीवन विस्कळीत
अंकुश भूमकर
लोणी धामणी : बिबट्याच्या संख्येत सर्वत्र दिवसेंदिवस वाढ होत असून त्याचे परिणाम मानवी जीवनावर होऊ लागले आहेत. नदीकाठच्या गावात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे बिबटे अशा क्षेत्रात वास्तव्यास असायचे; मात्र सध्या दुष्काळग्रस्त व डोंगर भागातसुद्धा बिबट्याचे वास्तव्य वाढले आहे.
बिबट्याचा धोका इतका प्रचंड प्रमाणात वाढला आहे की बिबट्या राज रोसपणे मानवी वस्तीमध्ये फिरताना दिसून येत आहे. त्यामुळे सध्या तरी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, आंबेगाव पूर्व भागातील गावांमध्ये बिबट्याचे दर्शन कधीही, कुठेही होऊ लागले आहे.
लोणी (ता. आंबेगाव) येथील डोंगराभाग शिवडीवस्ती येथे शुक्रवार (दि. 11) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास योगेश वाळुंज, किशोर वाळुंज, सोमनाथ वाळुंज यांना पुन्हा एकदा बिबट्याचे दार्शन झाले. तिघेही वाळुंज आपल्या शेतात थोड्या अंतरावर रात्री शेतात पाणी भरत होते. शेताच्या बांधापासूनच चराऊ रानाचा डोंगर भाग सुरू होतो. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी बिबट्याने ज्या ठिकाणी जर्सी गायीवर हल्ला करून ठार मारले.
नेमकी त्याच परिसरात बिबट्या आल्याने बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी रानात चरत असणाऱ्या जर्सी गायीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. आतापर्यंत बिबट्याने बांधनवस्ती, लंकेवस्ती या ठिकाणी शेळ्या, मेंढ्यांवर हल्ला करून ठार केले. या परिसरात बिबट्याचा वाढता वावर पाहता आता वनविभागाने बघ्याची भूमिका न घेता त्वरीत बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा आशी मागणी वाळूंज बंधूनी व शेतकरी ग्रामस्थांनी केली आहे.
लोणी परिसरात या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. सततच्या पावसामुळे व परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात भरपूर पडला शेतजमिनी उपाळल्या. खरिपातील शेतातली पिके वाया गेली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे केले; परंतु भरपाई मिळाली नाही. पाऊस भरपूर झाल्यामुळे या वर्षी ओढे नाले भरभरून वाहीले, विहिरी तुडुंब भरल्या मुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची मशागत करून ज्वारी, गहु, बटाटे, कांदा व इतर भाजी पाला, जणावरांचे खाद्य शेतात मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.
पिकांना पाणी देण्यासाठी थ्रीफेज विजेची आवश्यकता असून आठवड्यातून तीन दिवस थ्री फेज दिवसा व चार दिवस रात्री अशा पद्धतीने लाईट आहे; परंतु सध्या लोणी परिसरात बिबट्याचे दर्शन ठिकठिकाणी होते आहे. लोणीत एक गाय बिबट्याने मारली तर एका गोठ्यातून शेतकऱ्याने बिबट्या हुसकावून लावला, लंकेवस्तीत एका कुत्र्यावर हल्ला केला. अनेक लोकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. रात्रीच्या वेळी शेताला पाणी देण्यासाठी जाण्यासाठी घाबरतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने रात्रीच्या ऐवजी दिवसा 12 तास थ्रीफेज लाइट उपलब्ध करून द्यावी.
-बाळशिराम वाळुंज, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी