-अमित डोंगरे
जागतिक क्रिकेटमध्ये जेव्हापासून टी-20 प्रकारचे क्रिकेच सुरू झाले तेव्हापासूनच या वेगवान क्रिकेटला तुफान लोकप्रियता लाभली. भारताने सुरुवातीला हे क्रिकेट खेळण्यास नकारही दिला होता. मात्र, नंतर या क्रिकेटचे वारे भारतातही वाहू लागल्याने अखेर भारतानेही हे क्रिकेट आपलेसे केले. त्यातच 2007 साली झालेली टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा जिंकली व आपणही या क्रिकेटवर राज्य करू शकतो याचा दाखला दिला.
टी-20 च्या जगतात आयपीएल स्पर्धा सुरू झाली आणि पाहता पाहता आयपीएलने जग पादाक्रांत केले. तसेच पाहिले तर जगभरात बीग बॅश, पीसीएल, कॅरेबियन लीग, एसपीएल अशा कितीतरी टी-20 लीग जन्माला आल्या. मात्र, कौतुक केवळ आयपीएलचेच झाले. आपला मुलगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट नाही खेळला तरी चालेल, पण त्याला आयपीएल खेळवा, अशी मागणी घेऊन विविध क्रिकेट शिबिरांत प्रशिक्षकांकडे येत असलेल्या पालकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली यातच या स्पर्धेचे यश सामावले आहे.
ऑस्ट्रेलियाचे माध्यम सम्राट कॅरी पॅकर यांनी सुरू केलेल्या वर्ल्ड सुपर लीगला 1980 च्या दशकात पॅकर सर्कस म्हणून हिणवले गेले. मात्र, त्यांची दूरदृष्टी इतकी मोठी होती की त्यांनी सुरू केलेले पांढरा चेंडू, रंगीत कपडे व दिवसरात्र पद्धतीने खेळले जाणारे क्रिकेट जागतिक क्रिकेटची मक्तेदारी असलेल्या आयसीसीलाही अखेर आपलीसी करावी लागली.
क्रिकेटचे जन्मदाते असलेल्या इंग्लंडमध्ये फुटबॉल सामन्यांना स्पर्धा देण्यासाठी कमी वेळेत संपणारे क्रिकेट सुरू करण्याची जी कल्पना मांडली गेली त्यातूनच टी-20 क्रिकेटचा जन्म झाला. इंग्लंडचे एक वैशिष्ट्य आहे, ते जे काही सुरू करतात ते जगही आपलेसे करते. पोस्ट खाते, तार खाते, रेल्वे, फास्ट फूड आणि आता कसोटी व एकदिवसीय सामन्यांच्या या मूळ क्रिकेटसह टी-20 क्रिकेटही जगाने मान्य केले.
त्यातही आंतरराष्ट्रीय स्पर्धांबरोबरच लीग सुरू झाल्या व काही काळांनी 2007 साली सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेने लोकप्रियतेचे सारे विक्रम मोडून काढले. आज या स्पर्धेत आठ संघ सहभागी होतात व त्यात पाकिस्तान वगळता क्रिकेट खेळत असलेल्या सर्व प्रमुख देशांचे तसेच आयसीसीच्या सहयोगी देशांचे क्रिकेटपटू खेळतात.
वेगळी भाषा, भिन्न संस्कृती, भिन्न मते असे सगळे गुणदोष असूनही हे सर्व खेळाडू एकत्र येतात व क्रिकेटमध्ये पॉवर ऑफ युनिटी हे सूत्र सिद्ध करतात. भारतासारख्या देशात संस्कृतीत विविधतेतही एकता आहे. या स्पर्धेत देखील विविध देशांचे खेळाडू एकत्र येऊन हेच सिद्ध करत आहेत. या स्पर्धेतील सामन्यांत खेळत असताना प्रत्येक संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये वेगवेगळी पार्श्वभूमी, विविध भाषा बोलणारे खेळाडू वसुधैव कुटुंबकम निर्माण करतात.
खेळ हा एक भाग आहे, पण त्यातून या स्पर्धेद्वारे मनोरंजनाबरोबरच भिन्न संस्कृतींनाही एकत्र आणण्याची ताकद या स्पर्धेत आहे यात शंका नाही. या स्पर्धेत खेळणारे परदेशी खेळाडूंसह भारतातील स्टार खेळाडूही खेळत असल्याने नवोदित खेळाडूंना मोठ्या खेळाडूंच्या कामगिरीतून प्रेरणाही मिळते. जो अनुभव व मार्गदर्शन या नवख्या खेळाडूंना एकाच स्पर्धेतून मिळते ते संपूर्ण वर्षभर विविध सराव शिबिरात प्रशिक्षण घेऊनही मिळत नाही हेच या स्पर्धेचे महत्त्व आहे.