भारत-सीलोन ही शेजारी राष्ट्रे सुखाने नांदतील
मुंबई, ता. 11 – सीलोनचे पंतप्रधान सर जॉन कोटेलवाला हे आज दिल्लीच्या वाटाघाटी संपवून सीलोनला निघाले असून ते वाटेत येथे थोडा वेळ थांबले असता वार्ताहरांनी त्यांची मुलाखत घेतली. सर जॉन म्हणाले, आमच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या असून भारत व सीलोन ऐकमेकांना आदराने वागवून सुखाने नांदतील.
ते म्हणाले, भारत-सीलोन कराराच्या अंमलबजावणीसंबंधीचे गैरसमज निवळले असून बिन राष्ट्राचे लोकांचा दर्जा प्रश्नाबाबतही समाधानकारक खुलासा झाला आहे. आपण उभयंता कोलंबो परिषदेतील राष्ट्रे असून अनेक प्रश्नांवर आमचे मतैक्य आहे. आपणच भांडणाचे प्रदर्शन करू लागलो तर जगात आमचे हंसे होईल. आम्ही यश मिळवूनच वाटाघाटी पूर्ण केल्या. दोन वर्षांनतर बिन राष्ट्रांचे म्हणून राहणाऱ्या लोकांच्या अवस्थेसंबंधी विचारता ते म्हणाले, ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी पार पडल्या तर दोन वर्षांनंतर कोणी बिन राष्ट्राचे राहणारच नाही.
पुण्यांतील चौघा विद्यार्थ्यांचा सायकलवरून जगाचा प्रवास
पुणे, ता. 11 – पुण्यांतील इंजिनियरिंग कॉलेजचे चौघे विद्यार्थी सायकलवरून जगप्रवासाला निघाले असून त्यांनी सहा वर्षांचा पृथ्वीपर्यटनाचा कार्यक्रम आखला आहे. सायकलवरून पृथ्वीला प्रदर्शना घालता घालता टेलिकम्युनिकेशनचे शिक्षण घ्यावे, असाही या प्रवासातील त्यांचा, एक हेतू आहे.
पाश्चिमात्य राष्ट्रांतील शिक्षण संस्थांनी त्यांना सर्वप्रकारच्या सवलती देण्याचे कबूल केले आहे. एस. पी. कोतवाल, एम. इशान बलूच, बेहराम इराणी, आणि ओम प्रकाश विरमणी अशी त्यांची नावे आहेत. ते आज मुंबईला पोहोचले असून तेथून ते दिल्लीमार्गे लाहोरला जाणार आहेत.
पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, तुर्कस्तान आणि ग्रीस अशा क्रमाने ते जगभर प्रवास करणार. एका वर्षात ऑस्टेलियाला पोहोचण्याचा त्यांचा विचार असून युरोपांत दोन वर्षे राहणार. कॅनडा, अमेरिका, जपान, फिलिपाइन्स या देशांना भेटी देण्याचा त्यांचा विचार आहे. 1960 साली ते पुण्यांत परत येणार आहेत.