Formula of Mahavikas Aghadi । महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत अखेर जागा वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट 21 लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस पक्ष 17 लोकसभा मतदार संघात उमेदवार देणार आहे. शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 लोकसभा मतदार संघात उमेदवार उभा करणार आहे. अशी घोषणा आज एकत्रितपणे करण्यात आली. सांगली लोकसभा मतदार संघातील वाद आता मिटला असून या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बाळासाहेब थोरात तसेच शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
भिवंडी लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसच उमेदवार देणार असल्याची घोषणा या वेळी करण्यात आली.
ठाकरेंची पंतप्रधानांवर टीका Formula of Mahavikas Aghadi ।
काल तीन गोष्टींचा एकत्रित योग होता. एक तर सूर्यग्रहण होते. दुसरे म्हणजे अमावस्या होती आणि तिसरे म्हणजे नरेंद्र मोदी यांची सभा होती. असा वाईट गोष्टींचा विचित्र योग काल एकत्र आला होता. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी यावेळी नरेंद्र मोदींवर टीका केली. पंतप्रधान जर एका पक्षाचा प्रचार करत असले, तर त्यांना पंतप्रधान म्हणता येणार नाही. त्यामुळे त्यांना आम्ही उत्तर दिले तर, ते पंतप्रधानांना उत्तर दिल्याचे समजू नये. सरकारी यंत्रणाचा वापर करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे, त्यांना भेकड जनता पक्ष म्हणत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
कोण कोठे लढणार? Formula of Mahavikas Aghadi ।
-काँग्रेस(१७ जागा)ः नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई.
-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार(१०)ः बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड.
-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(२१ जागा)ः जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य.