शेवगाव – कमी दाबा मुळे आलेल्या मुसळधार पावसाने आज सायंकाळी पाच पर्यंत शेवगाव तालुका झोडपून काढला. दिवसभर लागून राहिलेल्या पावसाने होते नव्हते संपूर्ण खरिप पाण्यात गेले. शेतकरी पूरता हतबल झाला आहे.
गेल्याच आठवड्यात अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे झाले. गावोगावी शासकीय पथके फिरली. त्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जावून शेताचे फोटो काढून नुकसानीची टक्केवारी काढली. आज त्या टक्केवारीलाही काही अर्थ उरला नाही. थोडाफार वाचलेला दहा पंधरा टक्के वेचणीला आलेला कापूस भिजला. तुरीची फुले गळून गेली. कांदा बुडाला. शंभर टक्के खरिप पाण्यात गेल्याने सरसकट नुकसान भरपाई मिळाली तरच येथील शेतकरी उभा राहू शकेल. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पावसाने रहदारीचेही तीनतेरा वाजविले. शेवगाव -गेवराई राज्य मार्गावरील राक्षी, चापडगाव, ठाकूर पिंपळगाव, बोधेगाव, बालम टाकळी येथील ओढयावरील पुलांवर दोन तीन फुटपाणी वाहिल्याने दोन्ही बाजुंची वाहतूक पाच सहा तास रोखली गेली.
सायंकाळी पाच ला पावसाचा जोर उतरल्यावर हळूहळू वाहतूक पूर्व पदावर आली. मिरी मार्गे नगर हा मार्गही काही काळ बंद होता. ग्रामीण भागातील रस्त्यांचे तर बेहाल झाले. सायंकाळी पाच ला काही ओसरलेल्या पावसाचे सहाला पुन्हा आगमन झाले असून तो बहूतेक ठिकाणी रात्रीही टीकून राहिल असेच वातावरण आहे.