नवी दिल्ली – महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या स्थिरतेबद्दल शंका उपस्थित केल्या जात असतानाच आज महाराष्ट्राविषयी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी जे विधान केले आहे त्याचा वेगळाच अर्थ सध्या लावला जात आहे. त्यामुळे राज्यातील गोंधळाच्या स्थितीत भरच पडली असल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्रात आमचा सरकारला पाठिंबा आहे पण तेथील सरकार आम्ही चालवत नाही. स्वतः सरकार चालवणे आणि सरकारला पाठिंबा देणे यात मोठा फरक आहे, असे विधान राहुल गांधी यांनी आज केले होते. दरम्यान, राहुल गांधी यांच्या विधानाचा विपर्यास केला जात असल्याचे स्पष्टीकरण कॉंग्रेसकडून देण्यात आले आहे.
आज राहुल गांधींची व्हिडीओ कॉन्फरसिंगवरून पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांना महाराष्ट्रातील करोनाच्या स्थितीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्राच्या बाबतीत आमची स्थिती जरा वेगळी आहे. तेथे आमचा राज्य सरकारला पाठिंबा आहे. पण आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान या राज्यात स्वतः सरकार चालवत आहोत. स्वतः सरकार चालवणे आणि सरकारला पाठिंबा देणे या दोन भिन्न बाबी आहेत. त्यामुळे तेथील महत्त्वाची निर्णय प्रक्रिया आमच्या हातात नाही, असे विधान राहुल गांधी यांनी केले होते.
तथापि, महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे त्याकडे लोकांचे विशेष लक्ष असते आणि त्या शहराचे महत्त्वही आहेच. त्यामुळे त्या राज्याच्या स्थितीकडे केंद्र सरकारने अधिक लक्ष देण्याची गरजही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.