इस्लामपूर – निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या निर्णयामुळे सरकार अस्थिर करू पाहणाऱ्यांच्या हाती अपयश लागले आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थिर होतं… स्थिर राहील आणि कोरोनाविरोधातील लढा आम्ही यशस्वी करूच शिवाय राज्याची अर्थव्यवस्थाही आम्ही पुन्हा सुदृढ करू असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
सांगली येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण झाले. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयोगाला पत्र लिहून तशी विनंती केली होती. निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर निवडून जातील आणि तेच राज्याचे मुख्यमंत्री राहतील असा ठाम विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
विधान परिषदेतील २ रिक्त जागांपैकी एका जागेवर उध्दव ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने दोनवेळा वेळा राज्यपालांकडे केली मात्र त्याबाबत काहीही निर्णय झाला नाही. म्हणूनच या ९ जागांसाठी निवडणूक लवकर घेण्यात यावी अशी विनंती महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे केली होती.
देशासह संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढा देत असताना काहीजण राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. लोकशाहीच्या तथाकथित गळचेपीबाबत अनेकांनी राज्यपालांना पत्र लिहिली तर काहींनी देव पाण्यात ठेवले होते. सरकार अस्थिर होईल आणि आम्ही ‘पुन्हा प्रयत्न करू’ असे अनेकांना वाटत होते असा टोलाही जयंत पाटील यांनी भाजपाच्या नेत्यांना लगावला आहे