कराड – विंग, ता. कराड येथून बेपत्ता असलेल्या शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून अकस्मित मृत्यु झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. आदित्य बाबू कदम (वय 13, मुळ रा. म्हसवड, सध्या रा. विंग) असे संबंधित विद्यार्थ्याचे नाव आहे. छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्स ग्रुपला सातारा यांनी शोधमोहिम राबवून विहीरीतून अडीच तासांनी आदित्यचा मृतदेह बाहेर काढला.
ही घटना आत्महत्या की अपघात याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहेत.
याबाबात पोलिसांची व अधिक माहिती अशी की, शंकर पोळ हे मूळ म्हसवडचे असून ते अनेक वर्षापासून कुंटुंबासह मजुरीच्या कामासाठी विंग येथे स्थायिक आहेत. आदित्य शिक्षणासाठी त्यांच्याकडे होता.
आदित्य सोमवारी काढणे, ता. पाटण येथे आजीकडे साहित्य घेऊन जातो, म्हणून तो येथून घराबाहेर पडला. मात्र तो तिकडे पोहचलाच नाही. शंका आल्याने नातेवाईकांनी येथे परिसरात त्याची शोधशोध सुरू केली. त्यानंतर येथील घोरपडे पाणंद ते आदर्श विद्यालय दरम्यान एका विहीरीच्या काठावर त्याचे चप्पल व दळणाची पिशवी निदर्शनास आली. त्यानंतर विहीरीत शोधमोहिम राबवली.
विहीर खोल असल्याने काल त्यात यश आले नाही. आज सकाळी सातारा येथील छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्स ग्रूपला त्यासाठी पाचारण करण्यात आले. अडीच तासांनी आदित्यचा मृतदेह त्यांच्या हाती लागला.विंग येथील आदर्श विद्यालयात तो सातवीत शिकत होता. अदित्यचा अन्य एक भाऊ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे. घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून हवालदार सुरेश सावंत तपास करीत आहेत.