आज सर्व काही अनिश्चित आहे. शैक्षणिक सत्राचा प्रारंभ, वर्षाचा कालावधी, शिक्षकांची मानसिकता, अभ्यासक्रम कमी करण्याचा शिक्षण विभागाचा विचार, पुस्तक छपाई व वाटपव्यवस्था त्याबाबत ठोस निर्णय नसताना ऑनलाइन अभ्यासक्रम निश्चित कसा करता येईल
“प्रभात’मधील ऑनलाइन अभ्यासक्रम विषयावरील लेख वाचला. पाल्य, पालक, शाळा, महाविद्यालये, कोचींग क्लासेस यांचा उल्लेख करुन सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. समुपदेशन, डॉक्टर यांची मते अवलोकनार्थ घेऊन सर्वांना विचार करायला भाग पाडले आहे.
आजकाल शिक्षण क्षेत्रामध्ये परीक्षा, पेपर तपासणी, परीक्षांचे निकाल, शालेय वर्ष सुरु होणे, रद्द झालेल्या विषयांचे गुण कसे द्यायचे, अशा विविध विषयावर प्रचंड चर्चा चालू आहे. शिक्षणासह आरोग्य, उद्योगजगत, व्यापारी, कामगार, मजूर, दळणवळण, प्रवास, अर्थव्यवस्था, अन्न भोजन प्रश्न, सार्वजनिक जीवन या सर्वांवर करोना विषाणूचा भयावह परीणाम आपण पाहतो आहोत.
शेकडो शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये हजारो रुग्ण विलगीकरणामध्ये आहेत. करोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मृतांचे नातेवाईक, रेल्वेमध्ये जे मृत झाले त्यांचे नातलग, रुग्णसेवा करणारे डॉक्टर, पोलीस जे दिवसरात्र घराबाहेर आहेत, त्यांचे नातलग, कोणीतरी दोन घास पोटाला देईल, म्हणून वणवण फिरणारे, अन्नपाण्यावाचून घराच्या ओढीने शेकडो मैल पायी चालणारे अशा लोकांचा विचार डोक्यात आला की जीवनमरणामधील पुसट रेषा आक्राळ विक्राळ रुप धारण करुन स्पष्ट दिसू लागते. अंगाचा धरकाप होतो.
ऑनलाइन अभ्यासक्रमाचे खुळ ज्या मूठभर काही सुशिक्षीतांच्या डोक्यात आहे, त्यांनी करोना विषाणूच्या राक्षसाने जो कहर चालवलेला आहे, त्याकडे दुर्लक्ष केले आहे का? मी व माझे घर, मला इतरांचे काय?, अशी वृत्ती असणारे समाजाचा विचार करु शकत नाहीत? आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, आज सर्व काही अनिश्चित आहे. शैक्षणिक सत्राचा प्रारंभ, वर्षाचा कालावधी, शिक्षकांची मानसिकता, अभ्यासक्रम कमी करण्याचा शिक्षण विभागाचा विचार, पुस्तक छपाई व वाटप व्यवस्था त्याबाबत ठोस निर्णय नसताना ऑनलाईन अभ्यासक्रम निश्चित कसा करता येईल?
देशात इतकी विषय परिस्थिती आहे, की जेथे मोबाईल आहे तेथे रेंज नाही व रेंज आहे तिथे मोबाईल नाही. गरीबी भयावह आहे. अनेकांची मोबाईल घेण्याची ऐपत नाही. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे वय ऑनलाइनकरिता पुरेसे नाही. तज्ञांच्या मते माध्यमिक शाळेतील विद्यार्थी वीस मिनिटापर्यंतच स्थिरचित्ताने ऐकू शकतात, हे लक्षात घ्यावे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपयुक्त ठरेल.
काही राजकारणी, तसेच काही संस्थाचालक, काही खासगी क्लासवाले आर्थिक परवणी म्हणून ऑनलाइनकडे पाहतात. विशेषत: इंग्रजी माध्यमांच्या काही शाळांमार्फत हे फॅड जाणीवपूर्वक पसरवले जाते. फीच्या नावाखाली मोठी आर्थिक उलाढाल शिक्षण क्षेत्रात होते. आपण विज्ञानवादी आहोत हे सिध्द करण्यासाठी काही प्रोत्साहन देतात. पाल्यांच्या भविष्याबद्दलच्या भ्रामक कल्पनांमुळे काही पालक गोवले जातात. विद्यार्थ्यांना या संदर्भात स्वत:चे मतच नसते.
मोबाईल हे एक सर्वस्पर्शी, अदभूत वैज्ञानिक साधन आहे. त्याचा उपयोग कसा, कोणी, कधी व का करायचा? आणि किती वेळ करायचा याचे भान ठेवणे अगत्याचे असते. अन्यथा ते साधन घातक ठरते. म्हणूनच ऑनलाइन अभ्यासक्रमाचा विचार नव्याने व्हायला हवा.
प्रा. मधुसूदन मुळे माजी अध्यक्ष, हिंद सेवा मंडळ, नगर.