सातारा -वादळी पावसाच्या तडाख्याने विजेचे तब्बल 20 खांब व दोन रोहित्रे जमीनदोस्त झाल्याने जावळी तालुक्यातील अतिदुर्गम बामणोली खोऱ्यातील 15 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे अभियंते व जनमित्रांनी डोंगरदऱ्यात, जंगलात उद्ध्वस्त झालेल्या वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी करोनाच्या सावटातही तब्बल पाच दिवस शर्थीची झुंज देऊन आणि रविवारपर्यंत (दि. 19) टप्प्याटप्प्याने 15 गावे पुन्हा प्रकाशमान केली.
बामणोली खोऱ्यात गेल्या आठवड्यात मंगळवारी (दि. 14) सायंकाळी वादळी पावसाने थैमान घातले. यात डोंगरदऱ्यात व गर्द जंगलात असलेल्या महावितरणच्या वीज यंत्रणेला मोठा फटका बसला. उच्च व लघुदाबाच्या 20 विद्युत खांबांसह दोन रोहित्रे जमीनदोस्त झाली होती. फयान वादळानंतर प्रथमच अशा प्रकारचा तडाखा वीज यंत्रणेला बसला. महावितरणच्या वाई विभागांतर्गत तापोळा शाखेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या आणि दऱ्याखोऱ्यात विखुरलेल्या बामणोली, म्हावशी, पावशेवडी, मुनावळे, फाळणी, अंधारी, कोरघळ, आंबवडे, कारगाव, पिसाडी, काळकोशी, उमरेवाडी, शिवचीवाडी, शेंबडी व वाघळी या गावांमधील 750 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
हा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी 20 नवीन खांब व दोन रोहित्रे उभारणे, 250 ते 380 मीटर अंतर असलेल्या दोन खोल दऱ्यांमधून वीजवाहक तारा ओढणे, उन्मळून पडलेली झाडे व फांद्यांमध्ये गुरफटलेल्या वीजतारा काढणे व इतर तांत्रिक कामे करणे आवश्यक होते. त्यातील सहा गावे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशय परिसरात तर उर्वरित गावे डोंगरमाथ्यावर असल्याने तापोळ्याचे सहाय्यक अभियंता दत्तात्रेय जरे व सहकाऱ्यांसमोर प्रतिकूल निसर्गाचे आव्हान होते.
या दुरुस्तीच्या कामासाठी प्रथम बुधवारी (दि. 15) सातारा येथून नवीन वीजखांब व इतर साहित्य बामणोलीत पाठविण्यात आले. पोलिसांची परवानगी घेऊन महावितरणचे कंत्राटदार मॅगट्रॉन इलक्ट्रिकल्सचे 12 कर्मचारी बामणोलीत आले. त्यानंतर तापोळ्याचे दत्तात्रेय जरे, मेढ्याचे सहाय्यक अभियंता राहुल कवठे, कर्मचारी व 14 जनमित्र अशा 28 जणांनी दुरुस्तीच्या कामांना सुरवात केली.
दाट जंगल, जंगली श्वापदांचा संचार, बिकट रानवाटा, वाहतुकीच्या साधनांचा अभाव, अशा खडतर परिस्थितीत डोंगरमाथ्यावर नवीन वीजखांब कर्मचाऱ्यांनी खांद्यावरून नेले. या कर्मचाऱ्यांनी परिसरातील गावांमध्ये मुक्काम करत रोज सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत युद्धपातळीवर काम केले. त्यातच दोनदा पावसाने हजेरी लावली तरी काम सुरू होते.
पाच दिवसांत टप्प्याटप्प्याने 15 गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. यात वाईचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर यांनी सहकार्य केले. बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे व सातारा मंडलाचे प्रभारी अधीक्षक अभियंता उदय कुलकर्णी हे कामाची सतत माहिती घेत होते. या कामात जनमित्र रामू नाईक, गणेश जंगम, किरण मोरे, किरण माने, गणेश मोरे, समीर उतेकर, सचिन जाधव, मारुती जाधव, धनाजी चव्हाण, संजय पाटणे, नीलेश संकपाळ, तानाजी कदम, आनंदा शेलार, प्रमोद चव्हाण यांनी योगदान दिले.