सुरेश डुबल
कॉंग्रेसच्या हाताची बाळासाहेबांना साथ; शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर
कराड – महायुतीत बिघाडी तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रामाणिक आघाडीमुळे कराड उत्तर मतदारसंघात विक्रमी मतांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराने सहज विजय मिळवला. आमदार बाळासाहेब पाटील यांनी तिरंगी लढतीत तब्बल 49 हजार 215 मतांनी बाजी मारली. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम हे तीन नंबरवर फेकले गेले, तर भाजपचे बंडखोर उमेदवार मनोज घोरपडे यांना तब्बल 51 हजार मते मिळाली.
कराड उत्तर हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ल्यातील एक महत्वाचा बुरुज. येथे आमदार बाळासाहेब पाटील चार वेळा विजय झालेले आहे. या विधानसभेत कराड उत्तर मध्ये बाळासाहेब पाटील पंच मारणार? की महाआघाडीचा बोलबाला रहाणार? याकडे नजरा लागल्या होत्या.
काहीही करुन या निवडणुकीत आ. बाळासाहेब पाटलांना रोखायचे, यासाठी भाजपच्या मनोज घोरपडे यांनी गेली पाच वर्षापासून जय्यत तयारी केली होती.
जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतसे धैर्यशील कदम हे देखील कराड उत्तर मधूनच निवडणूक लढणार यावर ठाम होते. दोघांनीही तयारीला लागा, विजय आपलाच आहे, असे भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून या दोन्ही उमेदवारांना सांगितले होते. मनोज घोरपडे व धैर्यशील कदम या दोघांनीही मग प्रचाराचा धडाका लावला. दोघांच्याही सभेतील फलकांवर महायुतीच्या नेत्यांचे फोटो पहावयास मिळाले. यातील एकाला तिकीट फायनल होऊन, यंदा कराड उत्तर मध्ये दुरंगी लढत होईल, अशी अटकळ बांधली जात होती. निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात झाली.
तेव्हा आ. बाळासाहेब पाटील यांनी सुरुवातीलाच मोठे शक्तिप्रदर्शन करत निवडणूक अर्ज भरला. त्यानंतर अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्पा सुरु झाला. तरीही या मतदार संघातील तिढा काही सुटला नव्हता. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असल्याने येथे मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरु असतानाच धैर्यशील कदम यांच्या गळ्यात शिवसेनेच्या उमेदवारीची माळ पडली. त्यानंतर अस्वस्थ झालेल्या मनोज घोरपडे पेटून उठले. त्यांनी पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असे जाहीर केले. यात जनतेने त्यांना उस्फूर्तपणे पाठिंबा दिला होता. त्यामुळे कराड उत्तरमध्ये दुरंगी होणारी लढत तिरंगी झाली.
या तिरंगी लढतीचा थेट परिणाम महाआघाडीवर न होता महायुतीवर झाला आणि महायुती विखरली. तर तिकडे घर टू घर प्रचार आणि लोकांशी आपलेपणा ठेवून प्रस्थापित केलेले थेट संबंध या जोरावर आ. बाळासाहेब पाटील यांची या निवडणुकीत ही वाटचाल सुरु होती. महायुतीचे फसलेले नियोजन व बाळासाहेबांची एकाग्रता यात ही निवडणूक पार पडली. यात आ. बाळासाहेब पाटील यांनी विक्रमी मते घेत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांना धूळ चारली. ते तिरंगी लढतीत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तर भाजपचे बंडखोर उमेदवार मनोज घोरपडे यांनी 51 हजारांवर मते घेऊन दुसऱ्या नंबरवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना घोड्यावर बसून ठेवले होते. मात्र ऐनवेळी कदम यांना उमेदवारी दिली. तिकडे पाच वर्षापासून मतदारसंघाची चांगली बांधणी करणारे मनोज घोरपडे यांचे तिकीट कापणे महायुतीला महागात पडले. जर मनोज घोरपडे यांना शिवसेनेत घेऊन उमेदवारी दिली असती तर आज चित्र थोडे वेगळे दिसले असते. मात्र मतदारसंघातील माहितीचा अभाव व महायुतीची विस्कटलेली घडी, दोन्ही उमेदवारांना एकत्र करताना आलेले अपयश यामुळे महायुतीचे तीन तेरा वाजले. तर तिकडे मतदारसंघाशी जोडलेली नाळ व मतदारसंघात असलेला 24 तास वावर यामुळेच आमदार बाळासाहेब पाटील यांनी एवढे मोठे मताधिक्य घेत कराड उत्तर चा मीच साहेब हे पुन्हा एकदा दाखवले.