सूर्यकांत पाटणकर
पाटण – पाटण विधानसभा निवडणुकीच्या निकालाने आमदार शंभूराज देसाई यांचे तालुक्यावर असणारे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मात्र अपेक्षित मतदान मिळविण्यात त्यांना अपयश आले आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सत्यजित पाटणकर यांचा सलग दुसरा पराभव झाला आहे. पंचवीस हजाराच्या मताधिक्याच्या भुलभुलैयामुळे सत्यजित पाटणकर गाफील राहिले. त्यामुळे हातातून आमदारकी निसटली आहे. त्यामुळे या निवडणुकीत पराजयाचे खापर कोणाच्या डोक्यावर फुटणार, असा प्रश्न निष्ठावान कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे.
पाटण तालुक्यात विधानसभा निवडणूक अटीतटीची झाली आहे. पंधराव्या फेऱ्या अखेर हजार दोन हजार मताधिक्याने घासाघीस होणारी विधानसभेची रंगीत तालीम अखेर शंभूराज देसाई यांनी जिंकली. सत्यजितसिंह पाटणकर यांनी कडवी झुंज दिली. अठराशे कोटींचा विकास करुनही आमदार शंभूराज देसाई यांचे मताधिक्यात झालेली घट आमदार देसाई यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. 2014 ची निवडणूक 18 हजाराच्या फरकाने जिंकल्याने गेल्या पाच वर्षात आमदार देसाई यांचा आत्मविश्वास वाढला होता.
त्यातच सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून विकास निधीत झुकते माप मिळाल्याने विकास कामांबरोबर आक्रमकपणा कायम ठेवून कार्यकर्त्यांना सतत चार्ज ठेवले. मतदार संघातील संपर्क, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या हालचालींवर नजर ठेवून बालेकिल्ल्यात शिरकाव करण्यात आमदार देसाई यांना यश मिळाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील अंतर्गत वाद जिल्हा परिषद, पंचायत समिती मधील सत्ता असूनही त्या माध्यमातून केलेल्या विकासकामाचे मार्केटिंग करण्यात पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना अपयश आले.
याउलट आमदार देसाईंनी तालुक्यात झालेल्या प्रत्येक विकासकामाचे क्रेडिट स्वतः घेऊन राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांच्या गाफीलपणाचा फायदा उठवला. कोयना, पाटण, तारळे या भागात राष्ट्रवादीची घोडदौड रोखण्यात त्यांना यश आले. या भागात त्यांनी गेल्या पाच वर्षात जनसंपर्क कायम ठेवला होता. राजाभाऊ शेलार यांना शह देण्यासाठी सेनेचे जिल्हाप्रमुख पद जयवंतराव शेलार यांना दिले. शिरळ गण व हेळवाक गटात देसाई यांनी शिरकाव केला. परिणामी सत्यजित पाटणकर यांचे अपेक्षित मताधिक्य रोखण्यात त्यांना यश आले.
गेल्या पाच वर्षात विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे बजावण्यात राष्ट्रवादीला यश आले नाही. सरळ साधं व्यक्तिमत्व असणारे सत्यजितसिंह पाटणकर यांना जवळच्या सल्लागार मंडळींनी या निवडणुकी धोका दिला आहे. सतत दिशाभूल करणारी माहिती देऊन निष्ठावान कार्यकर्त्यांबाबत गैरसमज त्यांच्या मनात निर्माण करण्यात ही मंडळी यशस्वी झाली. तर जनतेचा नकार असणाऱ्या कार्यकर्त्यांचा त्यांच्या भोवती असणारा वावर हाही प्रमुख नाराजीचे कारण ठरले आहे. याबाबत तारळे व कुंभारगाव विभागातील कार्यकर्ते नाराजी उघडपणे बोलून दाखवत होते. मात्र या कार्यकर्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते. त्याचा फटका युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांना या निवडणुकीत बसला आहे.
या निवडणुकीत सत्यजित पाटणकर यांना पंचवीस हजार मताधिक्याचे गाजर दाखविण्यात आले. शंभूराज देसाई यांच्यावर पंचवीस हजाराच्या मताधिक्याने आपण विजय मिळवणार असे सुरुवातीपासून विकृत मंडळींकडून सांगण्यात आले. मात्र तालुक्यात परिस्थिती वेगळी होती. तरीही खासदार श्रीनिवास पाटील यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. याचा फटकाही सत्यजितसिंह पाटणकर यांना बसला. तर पंचवीस हजाराच्या मताधिक्यामुळे सत्यजित पाटणकर हे गाफील राहिले याचा परिणाम कार्यकर्त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करुन देण्यात त्यांना अपयश आले.
श्रीनिवास पाटील यांच्या पूर्वीच्या निवडणुकीचा अनुभव घेतला असता तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गाफील राहिले नसते. परिणामी बालेकिल्ल्यातील मतदानाची होणारी गळती थांबविण्यात त्यांना यश आले असते. चाफळ विभागात जिल्हा परिषदेचे मोठे पद देऊन ही राष्ट्रवादीला फायदा झाला नाही. उलट कार्यकर्त्यांची नाराजी उघड झाली. त्याचा परिणाम मताधिक्क्यावर झाला. कर्मभूमी चाफळ असताना सातारा-पुणे शटल सेवा करण्यात काहींनी धन्यता मानल्याने कर्मभूमीकडे दुर्लक्ष झाले.
याचा परिणाम या विभागातील मतदानावरुन दिसून आला आहे. ढेबेवाडी, कुंभारगाव विभागात आमदार शंभूराज देसाई यांचा असणारा राबता व केलेली विकासकामे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहेत. या विभागात राष्ट्रवादीला जनसंपर्काचा फटका बसला आहे. गेली साडेचार वर्षात या मतदारसंघाकडे राष्ट्रवादीने फिरवलेली पाठ हे या विभागातील मताधिक्क्य घटण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. तर या विभागात राजकारणही दुसऱ्यावर अवलंबून असल्यामुळे विभागात कार्यकर्त्यांमध्ये विस्कळीतपणा जाणवला.
अपशकुनी दाढी
माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी सल्ले सगळ्यांचे घेतले. मात्र काम करताना कार्यकर्त्यांना विचारात घेतले. त्यामुळे चाळीस वर्षे पाटण तालुक्याच्या राजकारणात अधिराज्य गाजवले. मात्र याउलट सत्यजित पाटणकर यांना सल्ला देणाऱ्यांमध्ये दाढीवाल्यांची संख्या वाढली आहे. एकेकाळी शंभूराज देसाई यांच्याकडे ही मंडळी होती. त्यावेळी अपवाद वगळता शंभूराज यांना यश आले नाही. त्यामुळे हीच दाढी सत्यजितसिंहाबरोबर असल्यामुळे त्यांनाही यश येत नाही. त्यामुळे अशा अपशकुनी दाढीची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.