कराड – स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वसा जपत आजपर्यंत मतदार संघात विकासकामे केली. मात्र विद्यमान आमदारांनी या मतदारसंघाला अद्यापही वंचित ठेवले आहे. स्वत:च्या वडिलांची स्वप्नपूर्ती न करणाऱ्या विद्यमान आमदारांवर जनताच नाराज आहे.
त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत काहीही झाले तरी कराड उत्तरचा आमदार बदलण्यासाठी जो काही निर्णय घेता येईल, तो घेण्याची तयारी ठेवली असून यावेळी कराड उत्तरेत परिवर्तन अटळ असल्याचा ठाम निर्धार वर्धन ऍग्रोचे नेते धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
येथील शासकिय विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हिंदूराव चव्हाण, भिमराव डांगे, सुदाम दिक्षीत, दीपक लिमकर, वर्धन ऍग्रो कारखान्याचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विकास सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
धैर्यशील कदम म्हणाले, सन 2014 मधील विधानसभा निवडणूकीत माझ्यासारख्या नवख्या उमेदवारावर कराड उत्तरच्या मतदार संघातील मतदारांनी विश्वास ठेवून सुमारे 60 हजार मते दिली. यावेळी मला पराभव पत्करावा लागला. तरीही निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून मतदार संघातील जनतेच्या विकासासाठी माझे प्रयत्न सुरुच आहेत. दहा हजार शेतकऱ्यांच्या माध्यमातून तेरा महिन्यात केवल शेतकऱ्यांच्या हितासाठी वर्धन ऍग्रो कारखान्याची निर्मिती केली.
कारखान्याच्या प्रारंभीच सभासदांना वीस हजार साखर मोफत दिली. मात्र विद्यमान आमदारांनी या मतदार संघात कितपत विकासकामे केली. हा संशोधनाचा विषय बनला आहे. ते पुढे म्हणाले, वर्धन ऍग्रो कारखान्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळीच भाजपात येण्याविषयी चर्चा केली होती. आता मात्र प्रवाहात राहणे मी पसंत करणार असून लवकरच याबाबत निर्णय जाहिर करण्यात येणार आहे.
यासंदर्भातील चित्र दि. 15 सप्टेंबरपर्यंत स्पष्ट होईल. निर्धार मेळाव्याचे निमित्ताने मतदार संघातील मतदारांशी संवाद साधणार असून निर्णय घेणार आहे. कराड उत्तर मतदार संघातील सहा जिल्हा परिषद गटात विद्यमान आमदारांनी जनाधार गमवला आहे. यामुळे या निवडणुकीत बिनकामाचा, अकार्यक्षम लोकप्रतिनिधी बदलण्यासाठी जो निर्णय घ्यावा लागले. तो घेण्याची मानसिकता ठेवली असल्याचेही कदम यांनी पत्रकारांना सांगितले.
यावेळी ना. चंद्रकात पाटील कराड उत्तरेतून मनोज घोरपडे यांची उमेदवारी जाहिर केली आहे, असे पत्रकारांनी छेडले असता कदम म्हणाले, पक्षश्रेष्ठीं लवकरच निर्णय जाहिर करतील. मला कामाला लागा असा शब्द दिला आहे. एकंदरीतच कराड उत्तरेत परिवर्तन हे होणारच. असा ठाम निर्धार कदम यांनी यावेळी व्यक्त केला.
उंब्रजला 13 रोजी निर्धार मेळावा
कराड उत्तर मतदार संघातील मतदारांना विश्वासात घेवूनच भाजपवासी होण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. यासाठी शुक्रवार, दि. 13 रोजी उंब्रज येथे भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, ना. अतुल भोसले, ना. शेखर चरेगावकर यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे.
“कामाला लागा’चा चंद्रकांतदादांचा आदेश
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने हालचालींनी वेग घेतला आहे. काहीच दिवसापूर्वी ना. चंद्रकांत पाटील यांची धैर्यशील कदम यांनी भेट घेतली. यावेळी कराड उत्तरसाठी कामाला लागा, आपल्याला कारभारी बदलायचा आहे, असा ना. पाटील यांनी शब्द दिल्याचा कदम यांनी पुनरुच्चार केला.