फलटणमध्येही सस्पेन्स वाढला : साहेबांच्या भूमिकेकडे लक्ष
सम्राट गायकवाड
सातारा – मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळण्याची स्थिती निर्माण झाली असतानाच खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी “डॅमेज कंट्रोल’साठी पुढाकार घेतला आहे. पुणे येथे नुकतीच पक्षाची बैठक घेऊन जिल्ह्यातील चार उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. आ. शशिकांत शिंदे हे कोरगावातूनच लढणार, हे जाहीर केल्याने ते साताऱ्यातून लढणार, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. आता साताऱ्यातून राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बैठकीला ना. रामराजे नाईक-निंबाळकर अनुपस्थित राहिल्याने फलटणच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढला आहे. परिणामी पक्षाध्यक्षांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीची स्थापना 1999 साली झाल्यापासून सातारा जिल्ह्याने पक्षाला कायम साथ दिली. त्यावेळी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आमदार सातारा जिल्ह्यानेच राष्ट्रवादीला दिले. आता वीस वर्षानंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळतो की काय, अशी परिस्थिती आहे. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला अन् बालेकिल्ल्याला सुरूंग लागण्यास सुरुवात झाली. मात्र, शिवेंद्रसिंहराजे वगळता अद्याप राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठींचे “डॅमेज कंट्रोल’चे प्रयत्न यशस्वी होताना दिसून येत आहेत.
त्यातच वाई, कराड उत्तर, कोरेगाव मतदारसंघांमधून विद्यमान आमदार लढणार आणि पाटणमधून सत्यजित पाटणकर लढणार, अशी घोषणा पक्षाने केली आहे. जिल्ह्यातील आठपैकी चार जागांवर राष्ट्रवादीचे काम आता सुरू होणार आहे. आ. शिंदे हे कोरेगावातून लढणार, हे निश्चित झाल्याने साताऱ्यातून कोण लढणार, याची चर्चा आता रंगणार आहे. तेथे अमित कदम यांच्या नावाची चर्चा आहे. खा. उदयनराजे यांनी राष्ट्रवादीतच राहणे पसंत केले तर त्यांच्या विचारांचा उमेदवार रणांगणात उतरवण्यात येऊ शकतो.
साताऱ्यात राष्ट्रवादीचे “प्लॅन बी’ तयार आहेत. मात्र, फलटण विधानसभा मतदारसंघात आव्हानत्मक स्थिती आहे. ना. रामराजे राष्ट्रवादी सोडणार, या चर्चेचे गुऱ्हाळ थांबायला तयार नाही. त्यांनीदेखील भूमिका स्पष्ट केली नसल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ आहे. अशा स्थितीत पवारांचे जुने कार्यकर्ते थोडे सुखावले आहेत.
रामराजेंनी राष्ट्रवादी सोडली तर आपल्या विचाराचा उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी जुन्या कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे फलटणमध्ये राष्ट्रवादीला उमेदवार मिळण्यात अडचण नाही; परंतु तो उमेदवार रामराजे समर्थक उमेदवाराला तुल्यबळ लढत देऊ शकेल का, हा प्रश्न आहे. अशा वेळी तेथे तिसरी आघाडी उदयास येऊ शकते. सर्वपक्षीय उमेदवार उतरविण्याची चाचपणीही सुरू आहे.
जिल्ह्यातील आठपैकी सहा जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा तिढा सुटला तरी उमेदवारी जाहीर केलेल्या विद्यमान आमदारांपुढे भाजपने तगडे आव्हान उभे केले आहे, हे नाकारता येत नाही. वाईत आ. मकरंद पाटील, कोरेगावमध्ये आ. शशिकांत शिंदे, कराड उत्तरमध्ये आ. बाळासाहेब पाटील आणि पाटणमध्ये सत्यजित पाटणकर यांचे कार्यकर्त्यांचे केडर स्ट्रॉंग आहे. मात्र, या मतदारसंघांमध्ये मूलभूत सुविधा वगळता दिशादर्शक प्रकल्प नेत्यांना उभारता आलेला नाही.
केंद्रात पुन्हा एकदा भाजपची एकहाती सत्ता आली आहे. परिणामी कार्यकर्त्यांचे केडर स्ट्रॉंग असले तरी जनतेच्या मनात नेमके काय आहे, याचा शोध घ्यावा लागणार आहे. तो शोध योग्य पध्दतीने व योग्य वेळी घेतला गेला
तरच बालेकिल्ल्याचे उर्वरित बुरूज शाबूत राहतील.
माण-खटाव मतदारसंघावर दावा?
2014 च्या जागावाटपात सहा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला तर कराड दक्षिण व माण-खटाव कॉंग्रेसला सोडण्यात आला होता तरीदेखील माण-खटावमध्ये राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी बंडखोरी करत चांगली मते मिळवली होती. आता कॉंग्रेसच्या जयकुमार गोरे यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्या जागेवर राष्ट्रवादी पुन्हा दावा करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीने घेतलेल्या मुलाखतीत प्रभाकर देशमुख, संदीप मांडवे, कविता म्हेत्रे, संदीप पोळ यांनी उमेदवारी मागितली आहे. सर्व इच्छुक उमेदवार दिग्गज असल्याने जागावाटपात माण-खटाव मतदारसंघ मागून घेऊन माढा लोकसभा मतदारसंघाचा वचपा काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो.