सातारा -जावळी तालुक्यातील केळघर, मेढा भागातील 54 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी बोंडारवाडी धरणाचे काम मार्गी लागणे आवश्यक आहे. बोंडारवाडी ग्रामस्थांनी काही मागण्यांसाठी या प्रकल्पाला विरोध केला होता. ग्रामस्थ, धरण कृती समिती व पाटबंधारे विभाग यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे. सर्वसमावेशक तोडगा काढून या प्रकल्पाचे काम लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
पिकाऊ शेतजमीन वाचवून धरणाचे काम व्हावे, अशी मागणी करून बोंडारवाडी ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. या मागणीनुसार आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी गुरुवारी (दि. 24) जागेची पाहणी केली. अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता महादेव धुळे, सहाय्यक अभियंता जयंत बर्गे, शाखा अभियंता संजय पांडकर, सरपंच बाजीराव ओंबळे, वसंत मानकुमरे, संदीप ओंबळे, गणपत ओंबळे, विष्णू ओंबळे, महेंद्र ओंबळे उपस्थित होते.
ग्रामस्थ, धरण कृती समिती आणि पाटबंधारे विभाग यांच्या समन्वय साधून हा प्रकल्प पूर्णत्वास जावा यासाठी आ. शिवेंद्रराजे प्रयत्नशील आहेत. धरणाच्या जागेत असलेली शेतजमीन वाचवी, अशी मागणी ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रराजेंकडे केली. 54 गावांचा पाणीप्रश्न आणि बोंडारवाडी ग्रामस्थांची शेतजमीन यांचा विचार करून. सर्वांच्या सहमतीने धरणाचे काम मार्गी लागेल, अशी ग्वाही आ. शिवेंद्रराजेंनी दिली.