सातारा, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे आणि मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, असे आवाहन देवदूत फौंडेशनचे अध्यक्ष सागर भोगावकर यांनी केले आहे.
भोगावकर म्हणाले, 18 व्या लोकसभेसाठी 19 एप्रिल पासून 1 जून पर्यंत सात टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. एकूण 543 लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडत आहे. देश आपल्या अठराव्या लोकसभा निवडणुकीला सामोरा जात आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्रातही 7 मे रोजी मतदान होत आहे.
या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी युती-आघाडी करुन मतदारांना वेगवेगळ्या क्लृप्त्यांनी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सूज्ञ मतदारांनी आपली मतदानाची ताकद ओळखून मतदान करुन संपूर्ण विश्वात भारत देशाला महान बनवण्यामध्ये आपली भूमिका बजवायची आहे.
आपली युवा पिढी मतदानाच्या दिवशी इतर कामात व्यस्त असते. पण मतदान करणे आपले कर्तव्य आहे. सर्वांनी बाहेर पडून मतदान करावे. पाच वर्षांत आपण राष्ट्रासाठी पाच मिनिटं देऊ शकतो. या खेपेला पाच मिनिटं मतदानाला जरूर देऊया. कारण मतदान हा आपला आवाज आहे, असेही ते म्हणाले.
मतदानाचा हा दिवस सुट्टीचा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी, नव मतदारांनी तसेच पालकांनी मतदानाच्या दिवशी गावी न जाता स्वत:ही मतदान करुन इतरांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहनही भोगावकर यांनी केले आहे.