म्हसवड, (प्रतिनिधी) – प्रहार जनशक्ती पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीतच आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम करत लोकसभेच्या या रणधुमाळीत माण-खटाव विधानसभेचा उमेदवार निश्चित केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी पुण्यात झालेल्या पदाधिकार्यांच्या बैठकीत माण-खटाव विधानसभेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांच्या नावाची घोषणा केली.
आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकार्यांची बैठक पुणे येथे झाली या बैठकीमध्ये सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेताना आ. बच्चू कडू यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाची किती ताकत आहे याची चाचपणी केली.
प्रहार जनशक्ती पक्षाने सध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत एकमेव उमेदवार उभा करुन लोकसभा निवडणुकीत आपल्याला स्वारस्य नसल्याचे दाखवले असले, तरी या पक्षाच्या पक्षप्रमुखांनी आगामी होणारी विधानसभा निवडणूक ताकतीने लढणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे.
आ. कडू म्हणाले, प्रहार जनशक्ती पक्षाने सातारा जिल्ह्यात या पक्षाने आपली मोठी ताकत निर्माण केली आहे. सर्वसामान्यांसाठी काम करणारा पक्ष म्हणून जनसामान्यात प्रहारला ओळखले जाते. याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेलेअरविंद पिसे यांनी गत 5 वर्षापासून माण-खटावमध्ये प्रहार जनशक्तीचे काम जोमात सुरु केले आहे.
कार्यकर्त्यांचे मोठे जाळे विनत पिसे यांनी प्रहारची भूमिका तळागाळापर्यंत पोहचवली आहे. त्यामुळे पक्षाने विधानसभेसाठी त्यांचा विचार केला आहे. पिसे यांच्या रुपाने सातारा जिल्ह्यात प्रहारचा पहिला आमदार निवडून येईल असा विश्वासही या बैठकीत व्यक्त केला.
दरम्यान, पिसे यांच्या पाठीशी असलेली जनशक्ती आपल्या सोबत लोकसभा निवडणुकीत रहावी यासाठी अनेक राजकीय मात्तबरांनी पिसे यांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवले. मात्र पक्षाशी, व जनतेशी प्रामाणिक असलेल्या या लोकनेत्याने आ. कडू सांगतील तेच आपले धोरण व सामान्य जनता सांगेल तेच तोरण असे म्हणत तटस्थ राहण्यात धन्यता मानली. तर लोकसभा आपल्यासाठी महत्वाची नसून विधानसभा निवडणुक हेच आपले अंतिम ध्येय असल्याचे पिसे यांनी सांगितले.