नगर – शेतकरी विरोधी विधेयक भाजप सरकारने संसदेत मंजूर करून घेतली आहे. त्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होणार आहे. कामगार वर्ग देशोधडीला लागणार आहे. या सरकारचा पूर्वानुभव पाहता ते आत्ताच गरीब शेतकऱ्यांवर हा कायदा लादत आहे. त्यामुळे देश पातळीवरील अखिल भारतीय कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नेतृत्वाखाली व कॉंग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांचे मार्गदर्शनाखाली देशातील शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन राष्ट्रपती यांना देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात येणार असून त्याचाच भाग म्हणून आज नगर तालुका कॉंग्रेसच्या वतीने बाबुर्डी घुमट देऊळगाव सिद्धी वडगाव तांदळी येथून सह्यांच्या मोहिमेत सुरुवात करण्यात आली.
यावेळी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्हस्के, जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ, जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ, संजय गिरवले, जनार्दन माने, साईराम बनकर व कॉंग्रेस पदाधिकारी यांच्यासह स्थानिक शेतकरी, कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शेळके यांनी या काळ्या विधेयकाच्या विरोधात लाखो शेतकरी व शेतमजूर, कामगार रस्त्यावर येऊन त्याला तीव्र विरोध करत असताना हे निर्दयी सरकार त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. नगर तालुक्यातून एक लाख शेतकरी व कामगारांच्या सह्यांचे निवेदन देण्याचा निर्धार व्यक्त केला.