जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अत्यंत सुमार दर्जाची पंचगिरी झाल्याचा आरोप बांगलादेश क्रिकेट मंडळाने तसेच दौऱ्यावरील संघ व्यवस्थापनाने केला आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत त्यांचे मंडळ आयसीसीकडे तक्रार करणार असून पुन्हा एकदा त्रयस्थ पंचांचीच नेमणूक केली जावी, अशी मागणीही केली जाणार आहे.
बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जितके सामने खेळले त्यातील जवळपास प्रत्येक सामन्यात काही निकाल बांगलादेशच्या विरोधात गेल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पक्षपाती पंचगिरी तसेच स्लेजिंगही झाल्याचे बांगलादेश मंडळाने म्हटले आहे.
डर्बनच्या कसोटीत पंचांचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले होते. बांगलादेशचा दुसरा डाव 53 धावात संपुष्टात आला होता. खेळाडूंना आक्षेपार्ह शेरेबाजीचाही सामना बांगलादेश संघाला करावा लागला होता. याबाबत मंडळाकडून आयसीसीकडे लेखी तक्रारही करणार आहे.