नवी दिल्ली – रस्ते अपघातांमध्ये भारतात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जगातील इतर कुठल्याही देशापेक्षा अधिक आहे. सर्वांधिक रस्ते अपघातांच्या संख्येत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. तशाप्रकारच्या अपघातांमध्ये जखमी होणाऱ्यांच्या संख्येतही भारत तिसऱ्या स्थानी आहे.
संबंधित माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. त्या माहितीसाठी जीनिव्हामधील आंतरराष्ट्रीय रस्ते संस्थेने जारी केलेल्या 2018 या वर्षासाठीच्या जागतिक आकडेवारीचा आधार घेण्यात आला.
रस्ते अपघातांत जीव गमावणाऱ्यांमध्ये तरूणांची संख्या मोठी असल्याचेही त्या उत्तरातून सूचित झाले. देशात 2020 या वर्षात रस्ते अपघातांत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 18 ते 45 वर्षे वयोगटातील नागरिकांचे प्रमाण सुमारे 70 टक्के नोंदले गेले.