भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख खासदार ब्रिजभूषण शरण यांना त्यांच्यावरील आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्या पदापासून दूर ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे देशातील प्रमुख कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे, असे म्हणावे लागेल. ऑलिंपिक आणि विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या कुस्तीगीरांनी ब्रिजभूषण यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप केले होते, ते निश्चितच गंभीर होते. त्याची दखल सरकारने जरा उशिराच घेतली, असे म्हणावे लागेल.
अर्थात, आता या कुस्तीगीरांनी विशेषत: महिला कुस्तीगीरांनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे जे आरोप केले आहेत ते जास्त गंभीर आहेत. अशा आरोपांची तातडीने दखल घेण्याची गरज असते. म्हणूनच क्रीडा मंत्रालयाने या आरोपांची चौकशी करण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली आहे. या ज्या सगळ्या घटना घडत आहेत त्या निमित्ताने भारतीय क्रीडा क्षेत्राला लागलेले एक ग्रहण समोर आले आहे. अर्थात, या विषयांमध्ये कुस्तीगीरांनी त्यांच्या प्रमुखावर केलेले आणि त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर केलेले आरोप असले, तरी देशातील इतर काही क्रीडा क्षेत्रामध्येसुद्धा अशाच प्रकारचा वाद निर्माण होऊ लागला आहे. देशातील सर्वात प्रमुख क्रीडा प्रकार मानण्यात येणाऱ्या क्रिकेटमध्येसुद्धा संघनिवडीच्या पद्धतीवरून आता वादाला सुरुवात झाली आहे. गेल्या कित्येक रणजी हंगामात सातत्याने धावा करणाऱ्या सर्फराज खान नावाच्या एका क्रिकेटपटूला अद्यापही भारतीय संघात स्थान मिळत नसल्याने ज्या प्रकारे वाद सुरू झाला आहे, तोही निश्चितच दखलपात्र आहे.
स्थानिक क्रिकेट हंगामामध्ये खोऱ्याने धावा करूनसुद्धा अनेक खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघामध्ये स्थान मिळत नाही, हा भारतीय क्रिकेटचा इतिहासच आहे. काही खेळाडूंना मात्र स्थानिक क्रिकेटमध्ये जास्त न खेळतासुद्धा भारतीय क्रिकेट संघामध्ये स्थान दिले जाते, अशीही काही उदाहरणे आहेत. सर्फराज खान याला डावलल्यामुळे जो वाद निर्माण झाला आहे त्याचीही दखल क्रीडा मंत्रालयाला घ्यावी लागणार आहे. तिसरीकडे, महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धेतील निकालावरूनही वाद सुरू झाला आहे. ज्या प्रकारे या स्पर्धेत पंचगिरी करणाऱ्या काही व्यक्तींना धमकी देण्यात आली आणि त्यांच्यावर पक्षपातीपणाचे आरोप करण्यात आले ते पाहता आगामी काळात महाराष्ट्र केसरीसारख्या कुस्ती स्पर्धेमध्ये पंचगिरी स्वीकारताना ज्येष्ठ कुस्तीपटू हजार वेळा विचार करणार आहेत. खरेतर कोणत्याही क्रीडा प्रकारामध्ये राजकारण येता कामा नये; पण जेव्हा क्रीडामध्ये राजकारण येते तेव्हाच अशा प्रकारचे वाद-विवाद निर्माण होतात आणि निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही. कुस्ती महासंघामध्ये जो वाद निर्माण झाला आहे त्याला जबाबदार कुस्ती महासंघाचे प्रमुख खासदार ब्रिजभूषण हेच आहेत. याबाबत काही लपून राहिलेले नाही.
तब्बल सहा वेळा खासदार झालेले ब्रिजभूषण सिंग यांचा इतिहासही वादग्रस्तच आहे. पाच वेळा भाजपच्या तिकिटावर आणि एकदा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले ब्रिजभूषण यांच्यावर टाडा खालीही कारवाई झाली होती. म्हणूनच त्यांच्यावर जेव्हा प्रमुख महिला कुस्तीगीरानी लैंगिक शोषणाचे आरोप केले, त्यानंतर त्यांची जी दरडावण्याची आणि धमकावण्याची भाषा होती ती अजिबात उचित नव्हती. क्रीडा क्षेत्रातील विविध संघटनांमध्ये नेहमीच आर्थिक गैरव्यवहार आणि इतर प्रकारचे आरोप केले जातात; पण जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप केले जातात तेव्हा त्याचे गांभीर्य निश्चितच जास्त असते. असा आरोप झाल्या झाल्याच कारवाई होणे महत्त्वाचे असते. सरकारनेसुद्धा आरोपानंतर तातडीने त्याची दखल न घेतल्यामुळे देशातील प्रमुख कुस्तीपटूंना राजधानी नवी दिल्लीमध्ये जंतरमंतर येथे धरणे आंदोलन करावे लागले. त्यानंतरच सरकारने त्यांची दखल घेतली. ज्या कुस्तीपटूंनी भारताचे प्रतिनिधित्व करताना ऑलिंपिक स्पर्धा आणि आशियाई स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल केले आहे, असे खेळाडू जेव्हा काही आरोप करतात तेव्हा त्याची निश्चितच प्राधान्याने दखल घेण्याची गरज असते.
अर्थात, उशिरा का होईना सरकारने दखल घेतली आणि या आरोपांची चौकशी होणार, हेही महत्त्वाचे आहे. महिन्याभराच्या कालावधीमध्ये चौकशी समिती जेव्हा आपला अहवाल सादर करील तेव्हा खरे काय ते समोर येईलच. पण विनेश फोगाट, साक्षी मलिक यांसारख्या महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणाचे आरोप करताना हजार वेळा विचार करतील, हे गृहीत धरावे लागेल. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये दहा ते बारा महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण झाले आहे आणि त्यांची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे अशा प्रकारचा दावा जेव्हा विनेश फोगट आणि साक्षी मलिक करतात तेव्हा हा विषय निश्चितच गंभीर मानावा लागतो. महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंग केवळ सत्ताधारी भाजपचे खासदार आहेत म्हणून या चौकशीमध्ये कोणताही अडथळा येता कामा नये. चौकशी समिती निरपेक्षपणे चौकशी करून सत्याचा शोध घेईल, अशीच आशा करावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे याबाबत पोलीस कारवाईही होण्याची गरज आहे. ज्या कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण झाले आहे, त्या धीराने पुढे आल्या तर ब्रिजभूषण यांच्यावर निश्चितच फौजदारी कारवाईसुद्धा होऊ शकते.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनेसुद्धा या घटनेची दखल घेतल्यामुळे आता भारत सरकारला आणि सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रीडा मंत्रालयाला गांभीर्याने या विषयाच्या मुळापर्यंत पोहोचावे लागणार आहे. तर क्रिकेटच्या विषयांमध्ये खरोखर स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या खेळाडूंनाच भारतीय क्रिकेट संघामध्ये स्थान देण्याचा विचार आता गांभीर्याने करावा लागणार आहे. भारतीय क्रिकेटची राखीव खेळाडूंची फळी मोठी असल्यामुळे सगळ्यांना जरी संधी देणे शक्य नसले तरी कामगिरीच्या बळावर निश्चितच गुणवान खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघामध्ये संधी मिळणे गरजेचे आहे.
सुनील गावसकर यांच्यासारख्या ज्येष्ठ क्रिकेटपटूने या वादाला तोंड फोडले असल्याने निवड समितीलाही याची दखल घ्यावी लागणार आहे. या नवीन वर्षामध्ये सर्वच क्रीडा क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये जर चांगले यश मिळवायचे असेल तर सर्वच क्रीडापटूंची मानसिकता सकारात्मक आणि चांगली असणे गरजेचे आहे. साहजिकच क्रीडा क्षेत्राला लागलेले हे वादाचे ग्रहण संपले तरच खेळाडू चांगली कामगिरी करण्यासाठी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तयार होऊ शकतात.