मराठी मनाचा मानबिंदू, जनतेचे मन जाणणारे जादूगार म्हणजे बाळासाहेब ठाकरे! त्यांची आज जयंती. त्यांच्या आठवणी सांगताहेत शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे…
बाळासाहेबांचं वक्तृत्व हे अत्यंत ज्वलंत आणि त्याचबरोबर लोकांना त्यांचं भान हरपून टाकणारं होतं. लक्षावधी लोक त्यांच्या सभांना यायचे. एखादी जादू पडावी किंवा एखाद्या मोहामध्ये अडकत जावे; अशा पद्धतीने त्यांच्या भाषणाच्या विचारांमध्ये लोक गुरफटून गेलेले दिसायचे. मुंबईमधल्या शिवतीर्थावरच्या त्यांच्या सभा, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक, कोपरगाव तसेच विदर्भ अशा त्यांच्या अनेक सभा बघण्याची मला संधी मिळाली. कुठल्या सभेत बाळासाहेब काय बोलणार, त्याबद्दल मला खूप उत्सुकता असायची. किंबहुना, ती केवळ माझ्याच काय, सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांच्या, श्रोते असतील किंवा वृत्तपत्रांचे संपादक असतील, त्या त्या भागांमध्ये स्थानिक इतर पक्षांचे पुढारी असतील आणि येणारे लोक अशा सगळ्यांच्या मनात उत्सुकता असायची की बाळासाहेब ठाकरे आज काय बोलणार?
बाळासाहेब ठाकरे यांची ज्या दिवशी सभा असायची त्या दिवशी सकाळी साधारणपणे ते भेटत नसत. परंतु विजयादशमीच्या दिवशी किंवा अन्य काही सभांच्या दिवशी सकाळी किंवा आदल्या दिवशी, संध्याकाळी, आम्हाला तिथे त्यांच्या स्वागताच्या निमित्ताने चार शब्द बोलायची संधी मिळायची. प्रत्येकाशी ते काही नर्म विनोद करायचे. सभेबद्दलची माहिती घ्यायचे. साहेबांनी बोलायचं आणि इतरांनी ऐकायचा असंच त्याचं स्वरूप असायचं. अधिक खासगी संवादातही फार कोणी त्यांच्या समोर बोलायचं नाही. माफकच स्वरूपामध्ये एक दोन वाक्य, चार-पाच वाक्य बोलायचे आणि नंतर मग जे काही निवडक लोक असत त्यांच्याशी त्यांचं बोलणं होत असे. आम्ही सभेच्या तयारीला लागायचो आणि दुसऱ्या दिवशी सभेमध्ये त्यांचं भाषण ऐकायचो.
काही वेळा सकाळी त्यांचं एखाद्या स्थानिक बातमीवर, समजा काही चर्चा झालीच किंवा बोलणं झालंच तर, माझा बालिश म्हणता येईल असा प्रश्न असायचा, “साहेब तुम्ही कसं ठरवतात की आज कुठले मुद्दे घ्यायचे?’ तेव्हा ते मला सांगत की, “आम्हाला जगदंबेचे वरदान आहे. कुठलं मैदान कसं आहे आणि कशा प्रकारची लोक आहेत किंवा त्या मैदानाचं एक व्यक्तिमत्त्व असतं आणि त्या मैदानावरच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व असतं, त्यानुसार मला जे बोलायचं ते मी बोलतो, ते जसं मला सुचतं त्याप्रमाणे मी तसं मांडतो.’
पण एका बाजूला ते विचार करत असायचे, काय विचार आहे- काय नाही. त्यात तात्पुरत्या स्वरूपाचे संदर्भ असायचे, तर काही मोठ्या प्रमाणामध्ये, अगदी दिल्लीमध्ये असणाऱ्या घटनांपासून ते काश्मीरमध्ये लाल चौकामध्ये तिरंगा फडकत नाही, याचे देखील शल्य त्यांच्या सभांमध्ये असायचं. तर दक्षिणेकडे कोणत्या पद्धतीच्या कारवाया चाललेल्या आहेत, त्यावरतीसुद्धा ते भाष्य करताना दिसायचे. त्यांच्या चौफेर स्वरूपाच्या भाषणातला अश्वमेधच होता तो. अनेक बाबतीत जिंकत असताना त्यांचा अभ्यास आणि त्यांची जी दृष्टी होती, ती दृष्टीही किती विशाल होती, विशाल म्हणण्यापेक्षा अति विशाल होती, देशव्यापीदृष्टी होती, असंसुद्धा मला निश्चितपणाने वाटतं. त्यामध्ये विनोद हा भाषणाचा प्राणवायू होता. काही भाषणांमधील विनोदाचे उदाहरणं मला आठवतात. लक्षावधी लोक असायचे. सगळेजण हसायचे, टाळ्या द्यायचे, काही लोक आनंदाने आरोळ्या ठोकायचे, अशा पद्धतीच्या त्या सभा असायच्या.
कोपरगावची सभा मला आठवते. त्या वेळेला आम्ही सभांमध्ये वंदे मातरम् शेवटी म्हणत असायचो. त्यावेळेला मला आठवते की, सभा संपली आणि जवळजवळ दीड पावणेदोन लाख लोक सभेला होते आणि वंदे मातरम् ज्या वेळेला झालं तेव्हा अक्षरशः टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता होती. ज्याला आपण असं म्हणू की अगदी पानंसुद्धा हलायची थांबली होती. पक्षी तर रात्र असल्यामुळे चिडीचूप आणि लोक स्तब्ध होते. एखादं चित्र असावं, एखादं पोर्ट्रेट असावं, लोकांचं एक सुंदर पोर्ट्रेट काढलं, तर ते जसं जिवंत भासेल पण स्तब्ध असेल, अशा पद्धतीनं लोक एक जीवाने, एक विचाराने, एक दिलाने त्या वंदे मातरम्साठी उभे होते. अशा प्रकारचं चित्र मला आजही आठवतं. त्यामुळे एक जादू नव्हे तर अद्भूत स्वरूपाची किमया सगळ्या लोकांच्या मनावरती झालेली असायची.
काही सभा अशाही झालेल्या असायच्या की, त्या सभांच्या वेळेला किंवा सभांच्या आधी ते जेव्हा पुण्यात आलेले होते, त्यावेळेला काही वेगळे प्रसंग घडलेले असायचे. एखादा कडवट प्रसंग घडलेला असेल किंवा कुणी तरी पक्षांतर केलेलं असेल, तर मग ते एक वेगळ्या प्रकारच्या मनस्थितीत असायचे.
मला इथे आठवतंय की, एखादा निर्णय घेत असताना बाळासाहेब कसे असायचे, त्याची मला एक विशेष आठवण आहे. “रंगशारदा’मध्ये आमचे शिबिर होते. त्या “रंगशारदा’च्या शिबिरामध्ये अत्यंत तणावाचं वातावरण होतं. कारण एका नेत्याने पक्षामध्ये बंड केलेलं होतं आणि त्या बंडाच्या मध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवरती तोफ डागलेली होती. अत्यंत विचित्र, संतापजनक अशा भाषेमध्ये त्यांची टीका चाललेली होती किंवा ते तसं बोलतायंत हे कळत होतं आणि ते आमच्या कानापर्यंत पोहोचावं असा त्यांचा प्रयत्न चाललेला होता. जेव्हा बाळासाहेब भाषणाला उभे राहिले तेव्हा ते काय करणार आहेत, टीका करून सोडून देणार की त्यांना काढून टाकणार का, ताकीद देणार, याची आम्हाला कल्पना नव्हती. बाळासाहेब एक श्लोक म्हणाले. त्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीला काढून टाकण्याची घोषणा केली. त्यानंतर “रंगशारदा’च्या बाहेर जे हजारो शिवसैनिक उभे होते, त्यांची जी काही त्याबद्दल प्रतिक्रिया उमटली ती म्हणजे, एखादा ज्वालामुखी फुटावा किंवा एखाद्या समुद्रामध्ये प्रलय व्हावा, अशा पद्धतीची ती प्रतिक्रिया होती. एक कोंडी फुटली होती, तर एक नवीन वळण घेतलं होतं. एक वेगळ्या प्रकारचा प्रहार करणाऱ्यांवरतीच प्रहार करण्याचं कसब बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेलं होतं.
उद्धव ठाकरे हे त्या सगळ्या केंद्रस्थानी आहेत, जे सर्वांना पुढे नेणाऱ्या नेत्याची भूमिका बजावत होते. बाळासाहेब मार्गदर्शक आणि गुरूस्थानी होते, त्यांनी मार्ग दाखवलेला होता की, कोणत्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचे आहे. म्हणून एका अर्थाने शिवसैनिकांच्या मनाची नस ओळखून त्याप्रमाणे योग्य तो निर्णय घेणे हे बाळासाहेबांनी अनेक वेळेला केलं. अनेक सभांमधून भाषणं केली. अनेक ठिकाणी ते बोलले. शिवतीर्थावर बोलले, बाहेर बोलले, साधारणतः बाळासाहेब काय बोलतील ते अपेक्षित असायचे. पण तरीही भाषणात विस्मयजनक काही भाग असायचा. ज्याच्यामध्ये धक्कातंत्र वापरलेलं असायचं, त्याच्यात वेगळा विषय असायचा. त्याच्यामधून बाळासाहेबांचं द्रष्टेपण सिद्ध व्हायचं.
मला आठवते की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या संदर्भातील घटना घडलेली होती. त्यावेळेला परभणीमध्ये जे काही त्यांचे तडाखेबंद भाषण झालं, त्यामुळे पूर्णपणे मतांचं ध्रुवीकरण झालेलं आपल्याला दिसून आलं. अनेक खासदार शिवसेनेचे नंतरच्या काळात निवडून आले. पण जी खदखद किंवा जी खंत लोकांच्या मनामध्ये होती, त्यालाच फुंकर घालण्याचं काम वेगळ्या पद्धतीने बाळासाहेब करत होते.
क्वचित कधी तरी असं व्हायचे की, जेवढ्या मोठ्या प्रमाणात सभा व्हायच्या तेवढ्या प्रमाणात मतांमध्ये यश मिळायचं नाही, त्यावेळेलासुद्धा त्यावरती ते विनोद करायचे. परंतु साधारणपणे बाळासाहेबांची सभा झाली आणि विजय मिळाला नाही, असं झालं नाही. तीच परंपरा नंतर उद्धव ठाकरेंनीसुद्धा कायम ठेवली, हे आज मी मोठ्या अभिमानाने सांगू इच्छिते. त्यामुळे 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये आमचं कार्य चांगलं झालं. त्याचबरोबर महानगरपालिकांच्या निवडणुका 2012, 2017 मधल्या असतील, त्या सगळ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये चांगल्या प्रकारचं काम झालं. त्यामुळे किमयागार किंवा जादूगार म्हणता येईल असे लोकांचे मन जाणणारे एक द्रष्टे नेते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांना जयंतीनिमित्त माझे कोटी कोटी प्रणाम!