पुणे -पुणे विभागात मागील काही दिवासांमध्ये नागरिक किंवा पाळीव प्राणी रेल्वे रूळ ओलडतांना अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या अपघातामध्ये बऱ्याचवेळा जीवित आणि अर्थिक हानी होते. तसेच धावत्या रेल्वेवर दगडफेकीच्या घटना देखील घडतात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्गंत पुणे-लोणावळा, मिरज आणि दौंड असे तीन मार्ग आहेत. या मार्गांवर दररोज दोनशेपेक्षा अधिक ट्रेन धावतात. पण, ग्रामीण भागातील रेल्वे रूळाच्या बाजूंना संरक्षण भिंत नसल्याने रेल्वे रूळावर पाळीव प्राणी येतात. त्यामुळे बऱ्याच वेळा दुर्घटना घडतात. तसेच नागरिकही काही वेळेस रूळ ओलांडतात. या अपघातात बऱ्याचवेळा त्यांचा मृत्यूदेखील होतो. तसेच पुणे विभागात धावत्या रेल्वेवर वर्षभरात 30 दगडफेकीच्या घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा घटनांचे “हॉटस्पॉट’ असलेल्या ठिकाणी रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. भिंतीच्या कामालाही सुरुवात झाली आहे.
नेमकी कुठे होते दगडफेक?
पुणे-लोणावळा मार्ग : तळेगाव, पिंपरी, चिंचवड, कासारवाडी, आकुर्डी आणि शिवाजीनगर.
पुणे-दौंड मार्ग : घोरपडी, लोणी, मांजरी, उरुळी, यवत आणि कराड.
रेल्वेवर दगडफेक वाढत असल्याचे लक्षात घेऊन रेल्वेमार्गाच्या बाजूने भिंत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात दहा किलोमीटर लांबीची भिंत उभारण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी निधीही मिळाला असून, काही ठिकाणी काम हाती घेण्यात आले आहे.
– डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, पुणे रेल्वे विभाग